
डिंभे धरण 82 टक्के भरले; घोडनदीपात्रात कोणत्याही क्षणी विसर्गाची शक्यता
मंचर / संतोष वळसे पाटील : आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी सात वाजेपर्यंत धरण 82 टक्के भरले आहे. धरणाची सुरक्षितता आणि पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी घोड नदीपात्रात वक्र दरवाजांद्वारे कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग करण्यात येऊ शकतो, असा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास किंवा आणखी वाढल्यास नदीपात्रातील विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी नदीपात्रात प्रवेश करू नये. नदीकाठावरील शेतीपंप, जनावरे, वाहने व इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डिंभे, गोहे, कानसे, महाळुंगे तर्फे घोडा, शिनोली, घोडेगाव तसेच घोड नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी.
संबंधित ग्रामपंचायती आणि महसूल प्रशासनाने दवंडी, ध्वनिक्षेपक व संदेशांच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून अफवांवर विश्वास न ठेवता सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे.
कोणत्याही क्षणी होऊ शकतो नदीपात्रात विसर्ग
“डिंभे धरणातील पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. परिस्थितीनुसार कोणत्याही क्षणी नदीपात्रात विसर्ग सुरू होऊ शकतो. नागरिकांनी नदीकाठापासून दूर राहून प्रशासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे.”
– दत्तात्रय कोकणे, वरिष्ठ अधिकारी जलसंपदा विभाग
मुंबईकरांची वाढली धाकधूक
काही दिवसांपूर्वी राज्यभर झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक रस्ते पाण्याखाली गेले, नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले, तर काही भागांत पूरसदृश्य परिस्थितीही निर्माण झाली. या पावसामुळे धरणे आणि तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती. त्यामुळे पाणीटंचाईची चिंता काही काळासाठी दूर झाली होती. मात्र आता परिस्थिती हळूहळू बदलताना दिसत आहे.
पालघरमध्ये पुराचे थैमान; वीजपुरवठा ठप्प, 2 लाख लोक अंधारात, तब्बल 900 नागरिकांचे स्थलांतर