
"स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोधक आजही..."; शरद पोंक्षेंनी उपस्थित केला रोखठोक सवाल
सावरकरांच्या विचारांची धग आजही कायम – पोंक्षे
‘युवकांचे स्फूर्तीदाते : स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमालेचे आयोजन
संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले प्रास्ताविक
पुणे: ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Pune News) यांना जाऊन सहा दशके उलटली, तरी त्यांच्या विचारांची धग आजही कायम आहे. मग विरोधक त्यांना आजही का घाबरतात?’ असा थेट आणि रोखठोक सवाल अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला. ‘शब्द कधी फिरवला नाही, हिंदुत्व कधी सोडले नाही; म्हणूनच सावरकर आजही जिवंत आहेत,’ असेही ते म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, हिंदुस्थान यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त व जय मातृभूमी युवा मंच यांच्या सहकार्याने चिंचवड येथे ‘युवकांचे स्फूर्तीदाते : स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अनंत कोऱ्हाळे, कृष्णा वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
धर्मासाठी कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी, तर धर्मासाठी कसे मरावे हे छत्रपती संभाजी महाराज यांनी शिकवले. ‘महापुरुषांच्या गोष्टी जिथे सांगितल्या जातात, तिथे सावरकर जन्माला येतात,’ असे पोंक्षे म्हणाले.
वयाच्या २३ ते ५४ या काळात सावरकर शिक्षा भोगत असल्याने समाजात सक्रिय राहू शकले नाहीत. त्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देशात विस्तारत होती. बंधमुक्त झाल्यानंतर त्यांनी हिंदू महासभा चे नेतृत्व स्वीकारून काँग्रेसच्या विचारसरणीला प्रखर विरोध केला. ब्रिटिशांनी असंतोष आटोक्यात ठेवण्यासाठी काँग्रेसची स्थापना केली, असा आरोपही त्यांनी केला.
वयाच्या ८३ व्या वर्षी आत्मार्पणाचा निर्णय घेतलेल्या सावरकरांनी राष्ट्राला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या साहित्यात आधीच दिली होती. ‘ज्या करांनी राष्ट्राला सावरायचे ते म्हणजे सावरकर,’ या नावाच्या अर्थाला त्यांनी आजन्म न्याय दिला. त्यांच्या विचारांचे मार्गदर्शन आजही तितकेच प्रभावी असल्याचे पोंक्षे यांनी अधोरेखित केले.
लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्राचे
महाराष्ट्र शासनाने परदेशातल्या एका ऐतिहासिक धरोहर लंडनमधील ताब्यात घेऊन ती स्मारक स्वरूपात जतन करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. हे पाऊल स्वातंत्र्यलढ्याच्या परंपरेला जागतिक दर्ज्यावर स्थान देण्याचा मानस यामागे आहे. माहितीप्रमाणे, महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांनी संयुक्त बैठकीत India House खरेदी व संवर्धन याबाबत चर्चा केली आणि एका बहुविभागीय समितीची स्थापना करण्याचा निर्णय झाला. ही समिती कायदेशीर, आर्थिक व प्रशासकीय बाबींचा अभ्यास करून अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करेल.