भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांचा इशारा (फोटो- istockphoto)
पुणे: गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला तांत्रिक वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्यात शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग या संघटनेने गुरूवार (दि.15) बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे भूमिअभिलेखच्या पुणे विभागातील सर्वच कार्यालयांचे कामकाज ठप्प पडले असून, कार्यालये ओस पडली आहेत.
दरम्यान पुण्यातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या बाहेर आंदोलनाने जोर धरला आहे. त्यामुळे परिसर आंदोलकांच्या घोषणांनी दुमदुमून गेला. दरम्यान या आंदोलनास राज्यातील भूमिअभिलेखच्या सर्व संघटनांनी पाठिंबा दिला आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विजय मिसाळ, सरचिटणीस अजित लांडे, धनाजी बाबर, कार्याध्याक्ष सुधीर पाटील यांनी दिली आहे.
भूमी अभिलेख विभागातील कर्मचार्यांना तांत्रिक वेतन श्रेणी देण्याकरिता शासनाने तत्कालीन जमाबंदी आयुक्त एन. के . सुधांशु यांचे अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन कडून अहवाल मागितला होता. त्याला जवळपास एक वर्षाचे वर कालावधी लोटला परंतु अद्यापपर्यंत त्या अहवालावर शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही, त्यामुळे राज्यभरातील कर्मचार्यांमध्ये वेतनश्रेणीच्या प्रश्नावर तीव्र असंतोष आहे.
भुमिअभिलेख खात्यामधील कर्मचार्यांच्या सेवा भरती नियमा शासनाने 2012 मध्ये दुरुस्ती करून सर्वपदाकरिता तांत्रिक अहर्ता निश्चित केल्यामुळे 2012 पासून या खात्यामधील सर्वच पदाकरिता बी इ सिविल डिग्री, सिविल डिप्लोमा अशी शैक्षणिक अहर्ता लागू केल्यामुळे या खात्यात सर्व पदावर तांत्रिक अहर्ता प्राप्त केलेले कर्मचा-र्यांनाच नियुक्ती दिल्या जातात. परंतु या पदाकरिता पगार हा कारकून संवर्गातील दिल्या जात असल्यामुळे कर्मचारी वर्गात तीव्र असंतोष आहे.
मीटरद्वारे पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव पडणार लांबणीवर
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीपट्टी मीटरद्वारे आकारण्याचा प्रस्ताव लांबणीवर पडू शकतो. निवासी वापराच्या मिळकतींसाठी मीटरद्वारे पाणी पट्टी (बिल) आकारणीची प्रस्ताव गेल्या महिन्याभरापासून आयुक्त कार्यालयात पडून आहे. मीटरद्वारे पाणी बिलात वाढ होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी हा प्रस्ताव मंजूर होण्याची चिन्हे नाहीत.
शहरात सध्या समान पाणी पुरवठा (24 तास पाणी पुरवठा ) योजनेचे काम सुरु आहे. याअंतर्गत शहरात जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. तसेच नळजोडाला पाण्याची मीटर बसविण्याचे काम केले जात आहे. पाण्याची गळती रोखणे, पाण्याचा अपव्यय कमी करण्याच्या हेतूने पाणी मीटर लावले जात आहे. सध्या व्यावसायिक वापराच्या मिळकतींना पाण्याचे बिल हे मीटर पद्धतीने देण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वीचे मीटर बदलून त्या ठिकाणी एएमआर पद्धतीचे मीटर बसविले जात आहे. या मीटरद्वारे आकारली जाणारी पाणीपट्टी पूर्वीच्या तुलनेत जास्त येत असल्याने तक्रारीत वाढ झाली आहे.