
मावळ तालुक्यात दुर्दैवी घटना; पवना नदीत पोहायला गेलेल्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू
वडगाव मावळ/सतिश गाडे : मावळ तालुक्यातील थुगाव परिसरात पवना नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ३) दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, पर्यटकांच्या निष्काळजीपणावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मृत तरुणांची नावे प्रथमेश शिंदे, अश्विन भालेराव आणि आयान शेख (सर्व राहणार पुणे) अशी आहेत. हे तिघे मित्र फिरण्यासाठी मावळमधील थुगाव परिसरात आले होते. पवना नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरल्यावर पाण्याची खोली व प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने एक जण बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी उडी घेतलेल्या इतर दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने तेही पाण्यात ओढले गेले. काही क्षणातच तिघेही पाण्याखाली गेले आणि त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ‘वन्यजीव रक्षक मावळ संस्था’ व ‘शिवदुर्ग मित्र लोणावळा’ या बचाव पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. निलेश संपतराव गराडे, अनिल आंद्रे, पिंटू मानकर, कैसर शेख, भास्कर माळी, विनय सावंत, गणेश गायकवाड, रवी कोळी, राजू सय्यद, अनिश गराडे, पोलीस पाटील धनंजय पोटफोडे तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. मोठ्या प्रयत्नांनंतर तिन्ही तरुणांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, सुटीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या या तरुणांवर काळाने झडप घातल्याने थुगाव परिसरात तसेच पुण्यात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही पर्यटकांकडून होणाऱ्या निष्काळजीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : विधान परिषद निवडणूक बिनविरोध! १० उमेदवारांचे अर्ज वैध, अपक्षांचे अर्ज बाद
पर्यटकांनी घ्यावी काळजी
नदी, धरण परिसरात पोहताना पाण्याची खोली आणि प्रवाह याचा अचूक अंदाज घेणे आवश्यक आहे. धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.