
खेड तालुक्यात मतदार सजग; पैशांची उधळण करणाऱ्या उमेदवारांना...
तालुक्यात चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गण असून, सर्वत्र निवडणूक वातावरण तापले आहे. मात्र यंदा मतदार केवळ पैशांच्या आमिषाला बळी न पडता उमेदवारांच्या कामगिरीकडे आणि विकासाच्या अहवालाकडे लक्ष देत असल्याची चर्चा सुरू आहे.
‘नोट नको, हवाय विकास’
“कितीही पैसे वाटा, पण मत मात्र आमच्या मनातील उमेदवारालाच,” अशी भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे. एकदाच पैशांच्या आमिषाला बळी पडल्यास पुढील पाच वर्षे विकासावर प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार कमी होतो, याची जाणीव मतदारांना झाली आहे. विशेषतः तरुण पिढी रोजगाराच्या संधी, दर्जेदार रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करणाऱ्या उमेदवारांच्या शोधात आहे. मतदार आता केवळ ‘नोट’ पाहत नसून उमेदवाराचे चारित्र्य, कामाचा आलेख आणि विकासाची दृष्टी तपासत असल्याचे दिसत आहे.
मतदानाच्या तोंडावर आमिषांची चर्चा
मतदानासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना काही उमेदवारांकडून पैशांचे वाटप व विविध आमिषे दिली जात असल्याच्या चर्चा तालुक्यात रंगल्या आहेत. मात्र निवडणूक नियंत्रण पथके केवळ नावालाच कार्यरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. “जर विजयाची खात्री आहे, तर पैशांची उधळपट्टी कशासाठी?” असा सवालही सुज्ञ मतदार उपस्थित करत आहेत.
भावनिक राजकारणालाही नकार
काही उमेदवारांकडून भावनिक वातावरण निर्माण करून ‘ही शेवटची निवडणूक’ असल्याचे सांगणे, तर काही ठिकाणी मतदारांसमोर आर्जव व अश्रू ढाळण्याच्या घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. तसेच दारू, मटण, बिर्याणी यांसारख्या पार्टींची चर्चा देखील रंगत आहे. मात्र स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार अशा प्रकारांपासून दूर राहून थेट संवादाच्या माध्यमातून मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे सुद्धा वाचा : राष्ट्रवादी सत्तेत भाजपसोबत, काँग्रेस एकाकी; सांगलीत नेमकं काय घडलं?
विकासकामांवरच अंतिम निर्णय
यापूर्वी विकासकामांच्या जोरावर काही लोकप्रतिनिधींनी आपली पकड मजबूत ठेवली आहे. मात्र निवडून आल्यानंतर वॉर्डात न फिरकल्याने काही सदस्यांविरोधात नाराजीही दिसून येत आहे. अनेक ठिकाणी तुल्यबळ लढतीमुळे राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. एकूणच, खेड तालुक्यात यंदाची निवडणूक ‘पैसा विरुद्ध विकास’ अशी ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, अंतिम कौल विकासाभिमुख उमेदवारांच्या बाजूने जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.