
हलगर्जीपणाचा फटका! अपूर्ण पुलामुळे देहेन गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
भाकरवड-देहेन गावाला जोडणारा जुना पूल निकामी झाल्यानंतर नव्या पुलाचे काम हाती घेण्यात आले. मात्र, हे काम उशिरा सुरू झाल्याने पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊ शकले नाही. पुलाच्या बांधकामासाठी नदीवर उभारण्यात आलेला तात्पुरता बंधारा मुसळधार पावसामुळे आणि पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे वाहून गेला. त्यामुळे गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला असून नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
भाकरवड आणि देहेन गावाजवळील नदीतून धरमतर खाडीमार्गे समुद्राचे भरतीचे पाणी येते. नदीचे पात्र अपुरे असल्यामुळे भरतीचे पाणी आणि पावसाचे पाणी मोठ्या वेगाने गावाच्या दिशेने येते. त्यामुळे दोन्ही गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता वाढली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, १९८९ च्या महापुरात भाकरवड आणि देहेन गावांमध्ये २० ते २५ फूट पाणी शिरले होते. त्यावेळी घरांचे, शेतीचे आणि अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या परिस्थितीची प्रशासनाला पूर्ण कल्पना असूनही योग्य नियोजन करण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
Raigad News: शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे! रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम; पेरणीची कामे खोळंबली
ग्रामस्थांनी यापूर्वीच शासन आणि गेल कंपनीच्या व्यवस्थापनाला निवेदने देऊन, प्रथम पाण्याचा योग्य निचरा होईल याची व्यवस्था करूनच काम करावे, अशी मागणी केली होती. रस्त्यालगत सुरू असलेले काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. असे झाल्यास संपूर्ण गाव पाण्याने वेढले जाऊन गोरगरीब शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.
ग्रामस्थ मंडळ भाकरवडचे अध्यक्ष शंकर बाळू पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हे काम सुरू करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे असताना ते अपूर्ण राहिल्याने आता गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामस्थ, शेतकरी, गेल समिती आणि प्रशासन यांनी एकत्रित बसून या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.