
Raigad News: नेरळ साकव पुलाचे काम अर्धवट; सुरक्षा कठडे नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात, ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संताप
नेरळ येथील रजिस्टर ऑफिसच्या बाजूने समर्थ मठ आणि शंकर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत पडून असल्याने गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक मोठा अपघात घडता घडता राहिला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असली तरी प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि ठेकेदाराचा निष्काळजीपणा त्या पुलाचे बांधकाम करताना दिसून आला आहे. या पुलाच्या कामासाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बांधकाम विभागाला २६ मार्च २०२५ आणि १९ एप्रिल २०२६ रोजी पत्र पाठवले होते. तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या उप अभियंत्यांनीही १९ सप्टेंबर २०२५ रोजी या कामासाठी निधी मंजूर करण्याची शिफारस केली होती आणि ती निधीमधून काम पूर्ण करण्यात आले आहे.
या पुलाचे काम अर्धवट ठेवून ठेकेदार कामाचे बिल काढून गायब झाला आहे. पुलाच्या स्लॅबचे दोन्ही बाजूला टाकण्यात आलेली खडी पावसाच्या पाण्याने वाहून गेली आहे. त्यात पुलाला सुरक्षा कठडे देखील बांधले नाहीत. त्या स्थितीत स्थानिक वाहनचालक यांच्याकडून प्रवास सुरू होता, मात्र पावसाळ्यात खडी वाहून गेल्याने आता दुचाकी वाहन देखील तेथून जात नाही. गुरुपौर्णिमादिनी नेरळ येथील समर्थ मठाकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी वर्दळ होती.
या दरम्यान, पुलाचे काम अपूर्ण व संरक्षण भिंत किवा सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसल्याने एका चारचाकी वाहनाचे चाक रस्त्यावरून थेट नाल्याच्या कडेला घसरले. सुदैवाने उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखून चालकाला व वाहनाला सुरक्षित बाहेर काढले, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार या ठिकाणी पाईप साकवाऐवजी आर. सी.सी. स्लॅब साकव मंजूर करण्यात आले होते. पण तेथे देखील ठेकेदाराने चुना लावण्याचे काम केले असून या कामाची चौकशी करा मागणी केली जात आहे.
संबंधित ठेकेदाराला किंवा प्रशासनाला तात्काळ हे अपूर्ण काम पूर्ण करण्याचे आदेश दिले जावेत, नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या निष्काळजी ठेकेदारावर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी तसेच काम पूर्ण होईपर्यंत अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी बॅरिकेट्स आणि इशारा फलक लावावेत. – बंटी शिर्के, मठाचे सेवेकरी