
Raigad News: पेणच्या बळीराजाला दिलासा; महापुरानंतर पावसाची साथ, भातशेतीत पुन्हा आशेचा अंकुर
सूर्यप्रकाशामुळे शेतशिवारात नर्सरी रोपांची दाणादाण उडाली असताना शेतशिवारात तग धरुन राहिलेल्या या रोपवाटिकांच्या हळूहळू होणाऱ्या वाढीमुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. तब्बल ११ हजार ६०० लागवडीखालील क्षेत्रावर डोंगरमाथ्यावरील तर खारेपाटातील उंचावरील भातशेतीमधे हे आशादायक चित्र सध्या पडणाऱ्या पावसामुळे दिसू लागले आहे. तरीही दुबार पेरणीसाठी बियाणे गोळा करण्यासाठी बळीराजाची धावपळ सुरु असुन पेण तालुक्यातील शिवारात ‘कही खुशी कही गम’ असे वास्तव चित्र दिसत आहे.
निसर्गाची अवहेलना न परवडणारी आहे, याचे वास्तव चित्र गेल्या ६ वर्षात लागोपाठ दिसून येत आहे. कृषीपूरक ग्रामीण संस्कृतीत ८० टक्के रोजगार मिळवून देत शेतकरी मजूर बारा बलुतेदार यांच्या पोटापाण्याची वर्षभराची व्यवस्था करणारी शेती व शेतकरी संकटात असल्याने गावगाड्यात सुगीच्या दिवसात जे चैतन्य खुशीचा माहोल दिसायचा तो सिमेंटचे जागोजागी उभारलेले इमले, मातीच्या भरावामुळे नैसर्गिक पाणी वितरणाच्या मार्गात अडथळे निर्माण होऊन शेत शिवाराला दर वर्षी मिळणाऱ्या जलसमाधीमुळे शेती व शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. हे परिश्रमाचे गीतगायन सध्या शिवारात दिसत नाही.
जिल्हा परिषदेच्या कृषी सभापतीनी पेण पंचायत समिती कृषी विभागामार्फत महाबीज बियाणांची पंच्याहत्तर टक्के अनुदानावर मोठी सुविधा दिल्याने दुबार पेरणीसाठी माफक किमतीत दहा किलो बियाणे बॅग १२५/-रुपये आणि पंचवीस किलो बॅग ३२५/ रुपयांना बियाणे बॅग दिल्याने शेतकरी बांधव समाधान व्यक्त करीत आहेत.
गेले पाच दिवस पंचायत समिती पेणतर्फे हे बियाणे वाटप करण्यासाठी स्वतः सभापती स्मिता पाटील, उप सभापती संजय डंगर आणि गटनेते विवेक म्हात्रे विद्यमान सर्व सदस्य आस्थेने शेतकरी बांधवाना मदतीचा हात देत आहेत, यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधान आहे. फाटलेल्या आभाळागत समस्येला ठिगळ लावण्यासाठी पुन्हा उमेदीने शेतशिवार सजविण्यासाठी ही उदयमशील भावना आणि दायित्व वाखाणण्याजोगे ठरते आहे. शिवारातले चैतन्य परत श्रृंगारण्यासाठी कष्टकरी बळीराजाला या कृतीने मोठा आधार मिळाला आहे.