
Raigad News: जिल्हा परिषदेत अध्यक्षपद ठरलं; आता ‘मलाईदार' खात्याकडे सर्वांचे लक्ष
Satara News : सभापती निवडीवेळी पत्रकारांना परवानगी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिवसेनेने स्वतंत्र लढा देत २१ सदस्य निवडून आपली ताकद दाखवली, तर राष्ट्रवादीला १६ आणि भाजपला १५ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालानंतर सुरुवातीला सत्तास्थापनेत पेच निर्माण झाला होता, मात्र वरिष्ठांची मध्यस्थी आणि खा. सुनील तटकरेंच्या नरमाईच्या भूमिकेमुळे महायुतीचा मार्ग मोकळा झाला. सत्तावाटपात अध्यक्षपदाचे सव्वा-सव्वा वर्षांचे सूत्र ठरले असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना अनुक्रमे संधी देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पक्षाला दोन सभापती पदे देण्याचेही ठरले आहे, मात्र अर्थ व बांधकाम या महत्त्वाच्या खात्याच्या सभापतीपदावर अद्याप एकमत झाले नाही. (फोटो सौजन्य – AI Created)
राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, हे खाते सहसा उपाध्यक्षाकडे दिले जाते. त्या पार्श्वभूमीवर रोहा येथील मधुकर पाटील यांचे नाव पुढे येत आहे. तरीही शिवसेना आपली ताकद दाखवत हे खाते आपल्या वाट्याला यावे, अशी ठाम भूमिका घेत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस हे खाते मिळवण्यासाठी आग्रही असल्याचे समजते. दरम्यान, अलिबागमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात महेंद्र दळवी आणि सुनील तटकरे यांच्यातील मतभेद दूर झाल्याची चर्चा असून, त्यामुळे महायुतीत वरकरणी सुसंवादाचे चित्र दिसत आहे, मात्र पडद्यामागे खाते वाटपावरून सुरू असलेली चुरस अद्याप कायम असल्याचे बोलले जात आहे.
रायगडच्या राजकारणात सध्या सर्व पक्ष एकत्र आल्याने ठोस विरोधक नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक मुद्दे शांततेतच मार्गी लागत असले, तरी अर्थ व बांधकाम खात्याचा तिढा मात्र कायम आहे. येत्या काही दिवसांत हे ‘मलाईदार’ खाते कोणाच्या झोळीत पडते, यावर रायगड जिल्हा परिषदेत पुढील राजकीय समीकरणे ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.