
मतदान प्रक्रियेसाठी पोलिस यंत्रणा अलर्ट
तीन हजार पोलिस तैनात
कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान
रत्नागिरी: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी (दि. ७) मतदान होणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, निर्भय पणे मतदारांनी घरा बाहेर पडुन मतदान करावे, यासाठी जिल्ह्यात खाकीचा खडा पहारा राहणार आहे. तब्बल साडे ३ हजाराचा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. हा बंदोबस्त बाहेरून मागविण्यात आला आहे.
त्यात स्थानिक पोलिसांचा स्वतंत्र बंदोवस्त देखील आहे. बंदोबस्तासाठी आणि वरिष्ठ स्तरावर समन्वयासाठी विशेष ८६ वरिष्ठ पोलिस अधिकारी बाहेरून नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक पोलिस दलानेही कंबर कसली आहे. दुर्गम भाग आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मतदान केंद्रांवर या जवानांची विशेष नजर असणार आहे.
बाहेरील जिल्ह्यांतून मागविले अतिरिक्त मनुष्यबळ
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेचा तिसरा स्तर म्हणून राज्य राखीव पोलिस दलाच्या २ कंपन्या मागविण्यात आल्या आहेत. या कंपन्या दंगल नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असतील. मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बाहेरील जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ मागवले आहे. यामध्ये प्रामुख्याने १८५३ होमगार्ड आणि १५३५ अंमलदार, एसआरपीएफच्या २ कंपन्या (३ अधिकारी आणि १८० अमलदार), आरसीपी प्लाटून २ (७० अंमलदार) असा अतिरिक्त पोलिस बंदोबस्त आहे.
दारू वाहतूक, आमिष दाखविल्यास कारवाई
मतदानापूर्वीच्या ४८ तासांत होणारी अवैध दारू वाहतूक आणि पैशांचे आमिष दाखवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अस्सा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.