
Pandharpur news: आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरकडे येत असताना त्यांच्या ताटात शुद्ध, सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न पोहोचावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने यंदा अत्याधुनिक पाऊल उचलले आहे. पालखी सोहळ्यासोबत ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ ही अत्याधुनिक मोबाईल प्रयोगशाळा तैनात करण्यात आली असून, संशयित अन्नपदार्थांची तपासणी करून अवघ्या एका दिवसात अधिकृत अहवाल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भेसळखोरांवर तात्काळ कारवाई करणे प्रशासनाला शक्य होणार आहे.
आषाढी वारीदरम्यान लाखो भाविकांच्या आरोग्याचा विचार करून अन्न व औषध प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. सोलापूर जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथील एकूण २० अन्न सुरक्षा अधिकारी वारीदरम्यान कार्यरत राहणार आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ९, तर इतर तीन जिल्ह्यांतील ११ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ या मोबाईल प्रयोगशाळेमुळे अन्नपदार्थांचे नमुने घटनास्थळीच तपासले जाणार आहेत. प्रयोगशाळेच्या दर्जाचा अहवाल अल्पावधीत उपलब्ध होत असल्याने भेसळ सिद्ध झाल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे.
भेसळयुक्त अन्नपदार्थ, दूषित पाणी किंवा निकृष्ट खाद्यपदार्थ आढळल्यास नागरिक आणि वारकऱ्यांनी तातडीने अन्न प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी १८००-२२२-३६५ हा टोल-फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे.पालखीसोबत असलेली ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ व्हॅन सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहे. त्यामुळे संशयित अन्नपदार्थांचे निदान तातडीने होईल. वारीसाठी २० अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत असून, नागरिकांनी कोणतीही तक्रार असल्यास टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
साहेबराव देसाई, सहाय्यक आयुक्त अन्न प्रशासन सोलापूर
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य पंढरपूर दौऱ्याचीही चर्चा रंगू लागली आहे.पंढरपूर आणि आषाढी वारीशी विशेष भावनिक नाते आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी पंढरपूर यात्रेच्या नियोजनात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. वारकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या ६५ एकर वारकरी क्षेत्राच्या विकासाला गती देत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.याशिवाय चंद्रभागा नदी परिसरातील स्वच्छता, स्नानासाठी सुविधा, गर्दीचे प्रभावी नियोजन आणि वारकऱ्यांना सुरक्षित व सुलभ दर्शन व्यवस्था यासाठी त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या कार्यकाळात आषाढी वारीच्या व्यवस्थापनात शिस्त, नियोजन आणि पारदर्शकता यावर विशेष भर देण्यात आला होता.
आता अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून ते पुन्हा आषाढी वारीत सहभागी होणार का, याकडे वारकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या संभाव्य दौऱ्याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी त्याबाबत उत्सुकता वाढली असून प्रशासनातील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पालखीसोबत ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ मोबाईल प्रयोगशाळा
संशयित अन्नपदार्थांचा २४ तासांत अधिकृत अहवाल
भेसळ सिद्ध झाल्यास तात्काळ कारवाई
वारीसाठी २० अन्न सुरक्षा अधिकारी तैनात
तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक : १८००-२२२-३६५
वारकऱ्यांना सुरक्षित व दर्जेदार अन्न देण्यावर प्रशासनाचा भर