छत्रपती संभाजीनगर: शिंदे-फडणवीस सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) 11 डिसेंबरला मोठा गाजावाजा करत उद्घाटन केलं. सुरुवातीला या महामार्गावरील नागपूर ते शिर्डी हा 480 किलोमीटरचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटरचा रस्ता सुरु करण्यात आला. पण गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे हा महामार्ग चर्चेचा विषय ठरला आहे. आधी अपघातांचं सत्र, त्यानंतर महामार्गावरील पोलिसांची वसुली आणि आता कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने वेळोवेळी टोल बंद केले जात आहेत. गेल्या दीड महिन्यात आतापर्यंत तीन वेळा कर्मचाऱ्यांनी वेतन थकल्याने टोल नाका बंद पाडल्याची माहिती मिळाली आहे. तर गुरुवारी (1 जून) रात्री देखील असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वैजापूर तालुक्यातील जांबरगावाच्या टोल प्लाझावर (Toll Plaza) पाहायला मिळाला.
समृद्धी महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगावच्या टोल प्लाझावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन गेल्या काही दिवसांपासून थकलेलं आहे. काहींचं दोन तर काहींचं चार महिन्यापासून वेतन मिळालेलं नाही. अनेकदा मागणी करुन देखील संबंधित कंपनीकडून वेतन वेळेवर मिळत नसल्याचं टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून आणि वेतन मिळत नसल्याने गुरुवारी रात्री 40 पेक्षा अधिक कर्मचारी कामावर न आल्याने टोल प्लाझा बंद पडला. दरम्यान गाड्यांच्या याठिकाणी रांगा लागल्या. शेवटी दुसऱ्या शिफ्टमधील इतर कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आलं आणि टोल सुरु करण्यात आले. मात्र यासाठी खूप वेळ लागला. विशेष म्हणजे वेतन मिळत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याची ही दीड महिन्यातील तिसरी वेळ आहे.
समृद्धी महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगावाच्या टोल प्लाझावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या काही दिवसांपासून होत नसल्याने संताप व्यक्त होतोय. विशेष म्हणजे यासोबतच टोल प्लाझावर जेवण पुरवणाऱ्या आणि चार चाकी वाहने पुरवणाऱ्या संस्थेचे देखील बिल थकल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनीही टोल प्लाझा बंद पाडला होता. शेवटी पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. त्यानंतर देखील एकदा हाच टोल प्लाझा वेतनाच्या मागणीसाठी बंद करण्यात आला. आता ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे संबंधित कंपनीचा भोंगळ कारभार वारंवार समोर येत आहे.
समृद्धी महामार्गामुळे कमी वेळेत सुखकर प्रवास करण्याचा हेतू ठेवत सरकारने हा महामार्ग तयार केला. पण आधी अपघातांचं सत्र आणि नंतर जड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून पोलिसांची वसुली यामुळे महामार्गाचं नाव बदनाम झालं.






