फोटो सौजन्य सोशल मीडिया
उंब्रजच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेत विशेष महत्त्व असलेल्या या उत्सवासाठी सकाळपासूनच भीम मंडप परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी अकराच्या सुमारास भीम मंडपात कुंती मातेच्या शेजारी अश्वारूढ रथात बसण्याच्या मानासाठी लिलाव पद्धतीने बोली लावण्यात आली. यामध्ये रा. उंब्रज येथील पै. प्रणव प्रल्हाद जाधव यांनी तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची सर्वाधिक बोली लावत कुंती मातेच्या शेजारी बसण्याचा मान मिळविला.
Satara Farmer News: महाराजा मल्टीस्टेटमध्ये बनावट सह्या करून फसवणूक? सातारात शेतकरी आक्रमक
दुपारी दोनच्या सुमारास कुंती मातेची अश्वारूढ रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पै. प्रणव जाधव हे कुंती मातेच्या शेजारी रथात विराजमान झाले. भैरवनाथ मंदिर, ग्रामपंचायत मार्गे ही मिरवणूक उंब्रजच्या मुख्य बाजारपेठेत दाखल झाली. मिरवणूक मार्गावर भाविकांनी कुंती मातेचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
मिरवणुकीदरम्यान व्यापाऱ्यांनी फळे, तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ताजा भाजीपाला कुंती मातेला अर्पण करून श्रद्धा व्यक्त केली. रस्त्याच्या दुतर्फा महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि बालकांची गर्दी झाली होती. ठिकठिकाणी भाविकांनी फुले व गुलालाची उधळण करीत कुंती मातेचे स्वागत केले. बॅन्जोच्या ठेक्यावर तरुणाईने जल्लोष केला. जयघोष, ढोल-ताशे आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण उंब्रज नगरी उत्सवाच्या रंगात रंगून गेली होती.
दुपारी चारच्या सुमारास मिरवणूक कॉलेज रोडवरील हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालून पुन्हा भीम मंडपाकडे रवाना झाली. सायंकाळी भीम मंडपात ‘पुत्र भीम’ आणि ‘कुंती माता’ यांच्या भेटीचा भावस्पर्शी व अपूर्व सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर भीम मंडपात पुत्र भीमाच्या शेजारी कुंती मातेची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी ‘भीमसेन महाराज की जय’ आणि ‘कुंती माता की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून सोडला.
उत्सवानिमित्त रात्री उशिरापर्यंत भीम मंडपात दर्शनासाठी भाविकांची गर्दी कायम होती. यात्रेच्या निमित्ताने विविध खाद्यपदार्थांची दुकाने, मेवा-मिठाईची दुकाने तसेच बालचमूसाठी पाळणे आणि विविध मनोरंजनाची साधने यामुळे बाजारपेठेला यात्रेचे स्वरूप आले होते. परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.
यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उंब्रज पोलिस ठाण्याचे सपोनि पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचा जागोजागी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या नियोजनामुळे यात्रा शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.






