
Ashadhi Wari, Palkhi Sohala
Satara News: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे बुधवारी सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. टाळ-मृदुंगाचा अखंड निनाद, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर, भगव्या पताकांची उधळण आणि हरिनामात तल्लीन झालेले लाखो वारकरी, अशा भक्तिमय वातावरणाने संपूर्ण सातारा जिल्हा भारावून गेला.
नीरा नदीतील पारंपरिक स्नानानंतर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या वतीने औपचारिक स्वागत करण्यात आले. पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले तसेच वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे यांनी पुष्पहार अर्पण करून माऊलींचे दर्शन घेत स्वागत केले. पोलीस बँडच्या सुरेल वादनाने स्वागत सोहळ्याची शोभा अधिक खुलली.
पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांनी रांगोळ्या, फुलांची उधळण आणि हरिनामाच्या गजरातून माऊलींचे स्वागत केले. अनेक सामाजिक संस्था, ग्रामस्थ आणि स्वयंसेवी संघटनांनी वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, फराळ, वैद्यकीय मदत आणि अन्य सेवा उपलब्ध करून दिल्या. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
वारकरी संप्रदायाच्या या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. पालखी मार्गावर पिण्याच्या पाण्याचे टँकर, तात्पुरती आरोग्य केंद्रे, रुग्णवाहिका, स्वच्छतागृहे, स्वच्छता पथके आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, संपूर्ण पालखी मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाच्या नियोजनाबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
माऊलींच्या स्वागतासाठी राज्य मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांसह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने या स्वागत सोहळ्याला राजकीय रंगही लाभला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख नेत्यांनी वारकरी संप्रदायाशी संवाद साधत उपस्थिती लावल्याची चर्चा पालखी मार्गावर रंगली. मात्र, राजकीय चर्चांपेक्षा “माऊली”च्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांसाठी हा दिवस भक्ती, समता आणि वारकरी परंपरेच्या संस्कारांचा उत्सव ठरला.