
फोटो सौजन्य: iStock
शशिकांत पवार। अहिल्यानगर: अहिल्यानगर तालुक्यातील ग्रामीण भागात परराज्यातील काही तरुण गावोगावी फिरून खारी, टोस्ट, बिस्किटे, पाव आदी बेकरी पदार्थांची घरोघरी विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या उत्पादनांबाबत तसेच विक्रेत्यांबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः या पदार्थांवर उत्पादन दिनांक, एक्सपायरी डेट, घटकांची यादी, अन्नसुरक्षा परवाना क्रमांक किंवा उत्पादक कंपनीचे नाव व पत्ता नमूद नसल्याने आरोग्य आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये आकर्षक पॅकिंगमध्ये हे पदार्थ विकले जातात. मात्र लेबलिंग नियमांचे पालन होत नसल्याचे दिसते. एक्सपायरी डेट नसल्यामुळे हे पदार्थ किती दिवसांपूर्वी तयार झाले, कशा परिस्थितीत साठवले गेले याची कोणतीही खात्री नसते. त्यामुळे अन्नसुरक्षेबाबत शंका निर्माण होत आहेत.
स्वस्त दरात उपलब्ध असल्यामुळे शेतकरी, महिला, विद्यार्थी व इतर नागरिक हे पदार्थ सहजपणे खरेदी करतात. परंतु उत्पादनाची माहिती नसल्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे चित्र आहे. अशा प्रकारे अनभिज्ञ ग्राहकांचा गैरफायदा घेतला जात असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते, निकृष्ट दर्जाचा कच्चा माल, अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया किंवा मुदत संपलेले पदार्थ खाल्ल्यास विषबाधा, पोटदुखी, जुलाब, उलटी, अॅलर्जी तसेच यकृत व पचनसंस्थेचे विकार उद्भवू शकतात. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी असे पदार्थ अधिक धोकादायक ठरू शकतात.
फिरत्या विक्रेत्यांची ओळख पडताळणी, अन्नपदार्थांची तपासणी, परवाना नसलेल्या विक्रेत्यांवर कारवाई आणि एक्सपायरी डेट नसलेले पदार्थ जप्त करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. गावोगावी जनजागृती मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात फिरणारे विक्रेते परराज्यातील असल्याचे सांगितले जात आहे. ओळखपत्र किंवा अधिकृत कागदपत्रे नसल्यामुळे काही ठिकाणी शंका व्यक्त केल्या जात आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित तरुणांची चौकशी करून त्यांच्या विक्रीतील पदार्थांची तपासणी करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.
एकूणच, ग्रामीण भागात फिरत्या विक्रेत्यांकडून होणाऱ्या बेकरी पदार्थांच्या विक्रीमुळे अन्नसुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.