amol kolhe target ajit pawar
पुणे : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी अद्याप आयोगाने कार्यक्रम जाहीर केला नसला तरी देखील आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षांचा प्रचार देखील वाढला असून नेत्यांच्या सभा वाढल्या आहेत. महायुतीसह माहविकास आघाडीमधील घटक पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. शरद पवार गटाकडून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. स्टार प्रचारक आणि खासदार अमोल कोल्हे पुण्यामध्ये आले आहेत. त्यांनी बाप्पाचे दर्शन घेत माध्यमांशी संवाद साधला आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्याचबरोबर पुण्यातील इतर सार्वजनिक गणपतींची देखील त्यांनी आरती केली. यानंतर अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आगामी विधानसभा निवडणूकीसाठी शरद पवार गटाची तयारी कशाप्रकारे असेल याबाबत अमोल कोल्हे यांनी सांगितले. खासदार कोल्हे म्हणाले की, विधानसभेसाठी शरदचंद्र पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असेल असे मत अमोल कोल्हे यांनी पुण्यामध्ये व्यक्त केले.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
माध्यमांशी संवाद साधताना अमोल कोल्हे म्हणाले की, बाप्पाकडे हेच मागितलं की,महाराष्ट्रावरील गुलाबीचं, फुलाफुलाचं, भ्रष्टाचाराचं, महिलांच्या असुरक्षिततेचं संकट दूर होऊ दे. सर्वसामान्य तरूणांचे स्वाभिमानी सरकार येऊ दे, हीच मागणी बाप्पाकडे आहे, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे कोपरखळी दिली. पुढे ते म्हणाले की, महायुतीच्या ज्या काही योजना येतात,त्या योजनांची नावे वेगवेगळी आहेत. कालच वर्षा बंगल्यावरील एक देखावा पाहिला. चांगल्या गोष्टींचे कौतुक झाले पाहिजे पण महायुतीच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे. महाविकास आघाडीचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्राचा जनमाणसांना काय हे सगळ्यांनाच माहित आहे. शरदचंद्र पवार सांगताल ते धोरण आणि बांधतील ते तोरण, असे विधान करत अमोल कोल्हे यांनी विधानसभा निवडणूकीचा विश्वास व्यक्त केला आहे.
याआधी देखील अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. गोंदियामधील शिवस्वराज्य यात्रेमध्ये अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, “येऊ नको म्हटलं तरी कोणत्या गाडीत बसू अशी अवस्था अजित पवार गटाची झाली आहे. महायुतीच्या सर्व्हेमध्ये अजित पवारांना फक्त 12 जागा मिळतील, मग बाकीच्या 28 आमदारांचे काय करायचे हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर असल्याने दादांनी बिहार पॅटर्ननुसार मुख्यमंत्रीपदाची मागणी केली असेल, असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना लगावला होता. त्यानंतर आता त्यांनी पुण्यामधून देखील अजित पवारांवर निशाणा साधला आहे.