नाशिक : खा.शरदचंद्र पवार साहेब म्हणजे राजकारण, समाजकारण, विकास, शिक्षण, कला, संस्कृती, क्रीडा, साहित्य, शेती या विषयांचे चालत बोलतं विद्यापीठ आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त स्व.यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथून व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पवार साहेबांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले.
[read_also content=”मोदींचे भाषण पक्षाच्या नेत्यासारखे वाटले, पंतप्रधान बोलताहेत असं वाटलं नाही शरद पवारांची टिका, कारण… https://www.navarashtra.com/maharashtra/modi-speech-sounded-like-a-party-leader-sharad-pawar-attacked-on-pm-modi-352981.html”]
खा.शरदचंद्र पवार साहेबांनी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा कुटुंबियांकडून मिळालेला वारसा कायम जपला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशावर नाही तर जगावर उपकार आहेत. त्यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखा महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. शेती क्षेत्रात त्यांच्या माध्यमातून क्रांती झाली. त्यामुळे आज जगाला शेती उत्पादने निर्यात करणारा भारत हा महत्वपूर्ण देश बनला आहे, हे पवार साहेबांचे योगदान असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
राज्यात महिला आयोगाची स्थापना केली. महिलांना आपले हक्क मिळवून दिले. महिलांना सर्व क्षेत्रात समान आरक्षण मिळवून दिलं. शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळाले पाहिजे, यासाठी त्यांनी ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण उपलब्ध करून दिले असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, पवार साहेबांनी केवळ देशात नाही तर जगभरात महत्वाची मानस जोडली आहे. त्यांना देशात संविधानावर काम करणार, राज्यघटनेला अभिप्रेत लोकशाहीवर चालणारे, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे सरकार दिल्लीत आणि राज्यात अभिप्रेत आहे. त्यासाठी तुमचे आमचे कर्तव्य आहे.
मंत्रालयात सर्व महापुरुषांच्या सोबत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेश द्वारावर लावण्यात आली. त्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो. परंतू त्यांच्याच मंत्रिमंडळात काम करणारे काही मंत्री महापुरुषांच्या विरोधात चुकीची टिपणी करत आहेत, हे योग्य नाही या वाचाळवीरांना आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आवरले पाहिजे, आणि त्यांना कडक समज दिली पाहिजे अशी भूमिका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मांडली.






