
मुंबई : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे (Ashok Chavan Resignation) आगामी निवडणूकींपूर्वी महाविकास आघाडीला (MVA) मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण कोणत्या पक्षात जाणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली असताना चव्हाण यांनी आपण भाजपमध्ये जाणार (Ashok Chavan Join BJP) असल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले असून विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर आमच्यापुढे फार मोठा पेच निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आता देशाला काय तोंड दाखवणार? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, आमच्यापुढे फार मोठा पेच निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशाला काय तोंड दाखवणार? असा प्रश्न आम्हाला पडला आहे. कारण महाराष्ट्र भाजपाने मोदींच्या शिरपेचात खोटेपणाचा आणखी एक तुरा रोवला आहे. मोदी यांनी नांदेडला जाऊन कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या भूखंड प्रकरणात अशोक चव्हाणांनी कसा घोटाळा केला याची माहिती दिली होती. चव्हाणांनी शहिदांचा कसा अपमान केला हे स्वतः मोदी यांनी नांदेडला येऊन सांगितलं होतं. तेच मोदी आता देशाला काय तोंड दाखवणार? भाजपाने शहिदांच्या अपमानाविरोधात महाराष्ट्रात आंदोलन केलं होतं. त्या शहिदांच्या अपमानाचं आता काय झालं? अशोक चव्हाणांना भाजपात घेऊन भाजपावाल्यांनी शहिदांचा तो अपमान धुवून काढला का? असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
कुठे नेऊन ठेवलीय भाजपा माझी? असा प्रश्न विचारण्याची परिस्थिती
पुढे संजय राऊत म्हणाले, “मला वाटतं सगळ्या पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजपा राजकारणात एक नवा आदर्श निर्माण करत आहे किंवा भाजपाने काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा आता बदलली पाहिजे. कारण त्यांनी काँग्रेसचं शुद्धीकरण चालवलं आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता आपल्या पक्षात घेऊन शुद्धीकरण मोहीम चालवली आहे. काँग्रेसबरोबर थेट युती करायचं टाळून भाजपावाले अशा प्रकारे काँग्रेसशी युती करत आहेत. सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र करून 400 पार उडी मारता येईल असं त्यांना वाटतं. परंतु, मला वाटतं, भाजपा अशा पद्धतीने 200 पारदेखील जाणार नाही. कुठे नेऊन ठेवलीय भाजपा माझी? असा प्रश्न विचारायची परिस्थिती त्यांच्यावर ओढवली आहे. महात्मा गांधी यांचं काँग्रेसचं शुद्धीकरण करण्याचं स्वप्न भाजपाने स्वीकारलं आहे असं दिसतंय.” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.