'मांडवलीसाठी नीलम गोऱ्हेंनी 25 लाख मागितले', ठाकरे गटाच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
नवी दिल्लीत झालेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गोऱ्हेंवर पलवटवार केला होत. त्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी गोऱ्हेंवर गंभीर आरोप केला आहे. देशमुख हे अकोला जिल्ह्यातल्या बाळापूरचे आमदार आहेत.
काय म्हणाले देशमुख?
अकोला महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा उल्लेख करत देशमुख म्हणाले की, येथील तत्कालीन विधान परिषदेचे जे आमदार होते, त्यांनी अकोला महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या संदर्भात विधान परिषदेत आवाज उचलला होता. त्यावेळी स्वत: नीलम गोऱ्हे यांनी हा प्रश्न दडपण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोप देशमुख यांनी केला आहे.
नीलम गोऱ्हेंनी आपल्याला बोलावत या प्रकरणात मांडवली करण्याचा प्रस्ताव दिल्याचं देशमुख यांनी सांगितलं. दोन वर्षांपूर्वीचे प्रकरण आहे. आपण गोऱ्हे यांच्या प्रस्तावाला विरोध करत नकार दिला होता. त्या प्रश्नाचं पुढं काय झालं हे माहिती नाही, असं स्पष्टीकरण देशमुख यांनी दिलं आहे.
एखाद्या आमदारानं प्रश्न मांडल्यानंतर कसा पैसा घ्यायचा आणि त्यामधून भ्रष्टाचाऱ्यांना कसं संरक्षण द्यायचं याचं जीवंत उदाहरण अकोला महापालिकेचं आहे, असा दावा देशमुख यांनी केला.
यापूर्वी नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनातील कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर खळबळजनक आरोप केला होता. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं, तर गल्ला गोळा करण्याचं काम एकनाथ शिंदेंना दिल्याचा गंभीर आरोप गोऱ्हे यांनी केला होता.
“हिंमत असेल तर नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा”, असं आव्हान बच्चू कडू यांनी दिलं आहे.“शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी जर उद्धव ठाकरे यांना मर्सिडीज गाड्या दिल्या असतील तर कोणत्या क्रमांकाच्या दिल्या ते त्यांनी सांगितलं पाहिजे. खरं तर नीलम गोऱ्हे यांच्याकडून आम्हाला या अपेक्षा नाहीत. त्या उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलल्या म्हणून मी बोलत नाही. मात्र, कोणत्याही नेत्यांना कोणत्याही नेत्यांच्या विरोधात बोलायचं असेल तर काही संदर्भ किंवा काही पुरावे दिले पाहिजेत. पण कोणतेही पुरावे न देता आपण बोलत असू तर ते योग्य नाही”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.