
अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सची माहिती मिळाली, फडणवीसांनी दिली तपासाची माहिती
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती देत तपासाची सद्यस्थिती सभागृहासमोर मांडली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सीआयडी आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) या दोन्ही यंत्रणांकडून तपास सुरू आहे. काही सदस्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली असली तरी एआयबीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच पुढील तपासाची दिशा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सीआयडीने तपासादरम्यान पायलट सुमित कपूर यांच्यावर संशयाच्या अनुषंगाने चौकशी केली. त्यांच्या सर्व बँक खात्यांची तपासणी करण्यात आली, मात्र कोणतेही संशयास्पद व्यवहार आढळले नाहीत. सीबीआय चौकशीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, एआयबीचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा असून त्यानंतर आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घेतला जाईल.
‘मिमिक्री आर्टिस्ट असते तर स्टँडअप कॉमेडियनना मार्केटच राहिलं नसतं’; फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला
फडणवीस यांनी सांगितले की, विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील सर्व आवश्यक माहिती यशस्वीरीत्या रिकव्हर करण्यात आली आहे. प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून अंतिम अहवाल जानेवारीपूर्वी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सामान्यतः अशा अहवालांना तीन ते चार वर्षांचा कालावधी लागू शकतो. मात्र, केंद्र सरकारने हा अहवाल दिवंगत नेत्यांच्या पुण्यतिथीपूर्वी सादर करण्याची विनंती संबंधित यंत्रणेला केल्याची माहितीही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, “भावना महत्त्वाची आहे, पण कायदा भावनेने चालत नाही.” एआयबीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच दोषी कोण, याचा निर्णय घेता येईल. पुरेशा पुराव्यांशिवाय कारवाई केल्यास ती न्यायालयात टिकणार नाही, त्यामुळे सरकार अंतिम अहवालाची प्रतीक्षा करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे सांगितले की, कर्नाटकमध्ये या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून, तपास यंत्रणांकडून सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे. अंतिम अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाईची दिशा निश्चित केली जाईल.