सोलापूर : पावसाळा आधीच उशिरा सुरु झाला आहे त्यामुळे अनेक समस्येला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकणी तर पावसाच्या मध्यावर पाणीटंचाई जाणवला लागली आहे त्या गावांमध्ये टँकरने पाणी पोहोचवले जात आहे. पावसाळ्याच्या मध्यावर दोन महिन्यानंतर थोडासा पाऊस पडला आहे. त्या पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. नंतर पावसाने मोठा खंड दिल्याने सोयाबीन, तूर, उडीद, मूग ही पिके जवळपास गेल्यात जमा आहेत. आता दिवस पुढे आल्याने दुबार पेरणी होणे देखील अवघड आहे. पाऊस पडत नसल्यामुळे दुसऱ्यांदा पेरणी करणे शक्य नाही.
त्याचबरोबर पाऊस पडत नसल्यामुळे वैतागून सोलापूरच्या बार्शी तालुक्यामधील राळेरास येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमधील सोयाबीन पिकावर रोटर फिरवून आपला संताप व्यक्त केला आहे. पावसाने मोठ्या प्रमाणात खंड दिल्याने खरीप हंगामातील ही पिके पावसाअभावी जवळपास वाया गेली आहेत. सध्याचा काळ हा फुले लागण्याचा काळ असून या काळामध्ये पाऊस नसेल तर हिरवं दिसत असलेले आणि सुकलेले पण त्याला शेंगा येऊ न शकणारे सोयाबीन ठेवण्यात काय अर्थ असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. पुढे पाऊस पडला तर रब्बी हंगामात काही तरी करता येईल.
या परिस्थितीला वैतागून बार्शी तालुक्यातील शेतकरी संतोष शेरखाने यांनी दोन एकर, बालाजी ढवळे यांनी तीन एकर तर गणेश प्रतापराव पाटील यांनी दोन एकर क्षेत्रावरील सोयाबीन पिकावर रोटर फिरवून निसर्ग व शासनाप्रती आपली नाराजी व्यक्त केली आहे.