
नदीपात्रातील पाणी उपसाबंदीला तात्पुरती शिथिलता; बाळासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
कराड : जिल्ह्यातील नद्यांवरील पाणी उपसाबंदीच्या आदेशामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. माजी सहकार व पणन मंत्री तथा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाने नदीपात्रातील पाणी उपसाबंदीच्या आदेशात तात्पुरती शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कृष्णा, कोयना, उरमोडी, तारळी, कुडाळी, वेण्णा, वांग आणि उत्तरमांड या नद्यांवरील उपसाबंदी २६ जूनपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस होऊन बहुतांश धरणे शंभर टक्के भरली होती. मात्र, जलसंपत्ती व्यवस्थापनातील त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग करण्यात आल्याने उन्हाळ्याच्या अखेरीस धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. परिणामी, कृषी पंपधारक आणि सहकारी पाणीपुरवठा संस्थांसाठी नदीपात्रातून पाणी उपसा करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले होते.
या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, तसेच सह्याद्री सहकारी साखर कारखाना पुरस्कृत विविध सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या वतीने बाळासाहेब पाटील यांनी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, कार्यकारी अभियंता प्रगती यादव तसेच महावितरणचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हाळनोर यांच्याकडे निवेदन सादर करून बंदी आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.
भारताच्या या राज्यात वसलंय भगवान शिवाचे अनोखे मंदिर, दिवसातून दोनदा पाण्यात होते गायब…
यानंतर सातारा पाटबंधारे विभागाने हा प्रस्ताव मुख्य अभियंता, कोल्हापूर यांच्याकडे निर्णयासाठी पाठवला होता. त्यावर वरिष्ठ स्तरावर सकारात्मक निर्णय झाल्यानंतर सहाय्यक अधीक्षक अभियंता, सातारा यांनी २२ जून रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून उपसाबंदी शिथिल करण्याचे आदेश दिले.
हजारो शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
या निर्णयामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शेतीसाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होणार आहे. पाणी उपसाबंदी शिथिल करण्याच्या निर्णयानंतर शेतकरी व सहकारी पाणीपुरवठा संस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले जात आहे.