ठाणे महापालिकेचा पातलीपाडा सेंद्रिय शेती प्रकल्प ठाणेकरांसाठी खुला, काय काय पाहता येणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून साकार झालेला ठाणे महानगरपालिकेचा पातलीपाडा सेंद्रिय शेती प्रकल्प आता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून या प्रकल्पाचे अनौपचारिक लोकार्पण करण्यात आले असून, ठाणेकरांना सेंद्रिय शेतीचे अनुभव प्रत्यक्ष घेण्याची संधी मिळणार आहे.
या प्रकल्पाची कल्पना फेब्रुवारी महिन्यात आयोजित वृक्षवल्ली प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांनी मांडली होती. त्यांनी नागरिकांसाठी आदर्श ठरेल असा सेंद्रिय शेती प्रकल्प उभारण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. त्यानुसार, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली, उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणाने एप्रिल २०२५ मध्ये या प्रकल्पाचे काम सुरु केले.
Electricity Supply : वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करणार, संजय जांभळे यांचा इशारा
सुमारे दीड एकर क्षेत्रात उभारण्यात आलेल्या या सेंद्रिय शेती प्रकल्पात भाजीपाला, फळझाडे, धान्य आणि विविध प्रकारच्या शेतीसंबंधित उपक्रमांची रचना करण्यात आली आहे. प्रकल्पाचे संपूर्ण व्यवस्थापन महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत केले जात असून, प्रकल्प क्षेत्रात कृत्रिम तलाव, मासे आणि वॉटर लिलीचीही निर्मिती करण्यात आली आहे.
उद्यान अधीक्षक केदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पात वांगी, भेंडी, टोमॅटो, मका, मिरची, कोबी, भुईमूग, रताळे, सुरण, कारले, दोडका, शिराळी, भोपळा अशा भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. यासोबत दोन प्रकारचे तांदूळ आणि नाचणीचेही उत्पादन देखील पाहायला मिळेल.
फळवर्गात आंबा, लिंबू, चायनीज लिंबू, ॲवोकॅडो, अंजीर, केळी, सिताफळ, लक्ष्मणफळ, डाळिंब आणि बुटका नारळ यांसारख्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. भविष्यात कोंबडीपालन, गायी, शेळ्या, बदक व टर्की पालन यांचा देखील समावेश करण्याची योजना आहे.
शांतीदूत गृहनिर्माण सोसायटीची कार्यकारिणी समिती बरखास्त करण्याच्या निर्णयाला एसआरएची स्थगिती
या प्रकल्पातून तयार होणारी सेंद्रिय उत्पादने अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना देण्यात येणार असून, हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरकच नव्हे तर सामाजिक भान जपणारा ठरणार आहे.
हा प्रकल्प सर्व नागरिकांसाठी सोमवार ते शनिवार, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत खुला असणार आहे. शाळांनाही त्यांच्या विद्यार्थ्यांसह भेट देण्याचे आयोजन करता येणार आहे, ज्यामुळे शालेय शिक्षणात सेंद्रिय शेतीचे ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव समाविष्ट करता येईल.
पातलीपाडा सेंद्रिय शेती प्रकल्प हा पर्यावरणपूरक, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून ठाणेकरांसाठी एक प्रेरणादायक उपक्रम ठरेल, असा विश्वास महापालिकेच्या उद्यान विभागाला आहे.