
ऐन पाडव्याला हापूस महाग; उत्पादनात मोठी घट झाल्याने दरात उसळी
पुणे : यंदाच्या हंगामात हवामानातील अनिश्चितता आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे हापूस आंबा उत्पादनात मोठी घट झाली असून, ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावरच आंब्याचे दर गगनाला भिडले आहेत. कोकणातील उत्पादन ६० ते ७० टक्क्यांनी घटल्याचा अंदाज व्यक्त होत असून, बाजारात आवक कमी झाल्याने ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे.
पुणे मार्केटयार्डात सध्या हापूसची आवक अत्यल्प आहे. दररोज केवळ १५० ते २०० पेट्यांचीच नोंद होत असून, गेल्या वर्षी याच कालावधीत दोन ते तीन हजार पेट्यांची आवक होत होती. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली असली, तरी पुरवठा अपुरा पडत असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या बाजारात हापूसचा दर डझनमागे सुमारे १,५०० ते ३,५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
यंदा कोकणात परतीच्या पावसाचा मोठा परिणाम झाला. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने प्रारंभी मोहोर चांगला आला; मात्र त्यानंतर तापमानातील चढ-उतार आणि दमट वातावरणामुळे मोहोरावर विपरीत परिणाम झाला. परिणामी मोठ्या प्रमाणात वांजमोहोर दिसून आला आणि अपेक्षित फळधारणा झाली नाही.
याशिवाय, थ्रिप्स आणि तुडतुड्या (हॉपर) किडींच्या प्रादुर्भावाने स्थिती अधिकच बिकट केली. या किडींमुळे मोहोर गळणे, फळांची वाढ खुंटणे आणि गुणवत्तेत घट होणे, अशा समस्या निर्माण झाल्या. परिणामी बागायतदारांच्या हाती केवळ ३० ते ४० टक्के उत्पादन लागल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवाढीमुळे यंदा सर्वसामान्य ग्राहकांना हापूसची चव चाखण्यासाठी अक्षय्य तृतीयेपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते, असे चित्र आहे.
व्यापाऱ्यांचे म्हणणे नेमके काय?
बदलत्या हवामानासह किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे, गेल्या दोन दशकांत प्रथमच एवढा तुटवडा जाणवत आहे. गुढीपाडव्याला हापूसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत,” असे आंबा व्यापारी मनोज शिंदे यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Alphonso Mango: आंबा, काजू बागायतदारांचा आक्रोश मोर्चा; मंत्री नितेश राणे काय म्हणाले?