पुणे : सिंहगडावरील टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. मधमाशांच्या हल्ल्यात अनेक तरुण-तरुणी गंभीर जखमी झाले आहेत. गडावरील पुणे दरवाजा पासून पुढे मधमाशा घोंगावत असताना पर्यटकांच्या सुरक्षेबाबत वन विभागाने मात्र कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसून आल्या नाहीत.
रविवारची सुट्टी असल्याने सकाळपासूनच सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी आहे. वाहनतळ पूर्ण भरून घाटरस्त्यावर एक किलोमीटर पेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गाडीतळापासून पुणे दरवाजापर्यंत व गडावरील पायवाटांवर दाटीवाटीने पर्यटक चालताना दिसत असतानाच टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. सकाळपासून सातत्याने या परिसरात मधमाशा घोंगावत असताना पर्यटकांच्या सुरक्षेबाबत वन विभागाने योग्य खबरदारी न घेतल्याने अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत.
दोन मुलींच्या शरीरावर चिपकल्या मधमाशा
दोन मुली मदतीसाठी मोठमोठ्याने ओरडत होत्या. त्यांच्या संपूर्ण शरीरावर मधमाशा चिकटलेल्या होत्या. त्या वाचवा वाचवा म्हणून किंचाळत होत्या. परंतु भीतीमुळे सर्वजण आपापला जीव वाचवून पळत होते. हॉटेल चालकांनी धूर करुन मधमाशांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या मुलींपासून धूर लांब असल्याने उपयोग होत नव्हता. असं एका पर्यटकांने सांगितलं.
मधमाशा दिसल्याने पर्यटक पळाले
अचानक मधमाशा दिसल्याने आम्ही पळालो. हजारो पर्यटक गडावर होते. जर मोठ्या प्रमाणात मधमाशांनी हल्ला केला तर लोक पळणार तरी कोठे? संबंधितांनी याबाबत काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असं एका पर्यटकाने म्हटलं.
कोणतीही व्यवस्था सिंहगडावर नाही
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कोणतीही व्यवस्था नाही. सिंहगडावर सुट्टीच्या दिवशी सरासरी पाच ते दहा हजार पर्यटक येतात. मधमाशांचा हल्ला, दरड कोसळणे किंवा इतर दुर्घटना घडतात. त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांचा जीव वाचविण्यासाठी कोणतीही व्यवस्था सिंहगडावर नाही. जखमींना त्वरित उपचारांसाठी घेऊन जाण्यासाठी साधी रुग्णवाहिकाही उपलब्ध नसते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन सिंहगडावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिवप्रेमी आणि पर्यटकांकडून होत आहे.