
फोटो सौजन्य - Social Media
Washim News : वाशिम जिल्ह्यात कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या शेतकरी गट स्पर्धा अभियान (फार्मर ग्रुप लीग – FGL) २०२६ ला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील एकूण ७६८ शेतकरी गटांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला असून कृषी क्षेत्रात सामूहिक कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे.
स्पर्धेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वाशिम येथील स्व. बाळासाहेब ठाकरे प्रशिक्षण केंद्रात सहभागी शेतकरी गटांच्या प्रतिनिधींसाठी तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणात अभियानाची संकल्पना, स्पर्धेचे निकष, गट व्यवस्थापन, मृदा आरोग्य संवर्धन, बियाणे उगवण चाचणी, बीजप्रक्रिया, सरी-वरंबा व बीबीएफ पद्धती, शेत पुनर्भरण खड्डे, नैसर्गिक शेती, हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब आणि पीक संरक्षण यासह ऑनलाइन माहिती भरण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
ही स्पर्धा ३१ जुलैपर्यंत चालणार असून या कालावधीत सहभागी गट विविध कृषी विकासात्मक उपक्रम राबविणार आहेत. शेतकरी गटांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण करणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार वाढविणे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे आणि शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करणे ही या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
तालुकानिहाय सहभागात रिसोड तालुका १४८ गटांसह अव्वल ठरला असून त्यापाठोपाठ वाशिम (१३५), मानोरा (१३१), कारंजा (१२८), मालेगाव (११५) आणि मंगरुळपीर (१११) तालुक्यांचा समावेश आहे. याचबरोबर शासनाच्या ‘खेती बचाओ अभियान’ ची अंमलबजावणीही या शेतकरी गटांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मृदा आरोग्य संवर्धन, जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, नैसर्गिक शेतीचा प्रसार, हुमणी अळी नियंत्रण, पीक संरक्षण आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा प्रचार-प्रसार या अभियानातून केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अमरावतीचे कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांच्या प्रोत्साहनातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके आणि कृषी विकास अधिकारी अभिजीत देवगीरकर यांनी प्रशिक्षणादरम्यान शेतकरी गटांना मार्गदर्शन केले. उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय स्तरावर सहभागी गटांना सातत्याने मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाणार आहे.