परराज्यात मराठी लोकांना काय म्हणतात, 'खरेदी करता येणारे लोक'...; राज ठाकरेंनी सगळं सांगितलं
Raj Thackeray News: “बाहेरच्या राज्यात आपल्या महाराष्ट्राबद्दल काय बोलले जाते माहितीये का, मलाच सांगायला लाज वाटते. “(Purchaseble People)विकत घेता येणारी माणसे,” अशा उद्देशाने आपल्या महाराष्ट्रातील लोकांबद्दल बोलले जाते ही आपली प्रतिमा आहे का, हिंद प्रांतावर सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र विकला जातोय. बिकाऊ आहे. इथली माणसं विकली जातात, आपली भाषा, जमिनी सगळं सोडून द्यायला तयार होतो असा आपला महाराष्ट्र आहे का,” असा संतप्त सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. रायगडमध्ये आयोजित शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सभेत ते बोलत होते. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून हिंदी-मराठी, मराठी- गुजराती वादाच्या ठिणग्या पडत आहेत. त्यातच गेल्या महिन्यात राज्य सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णय़ावरूनही राजकारण तापलं होतं. त्यावरून राज ठाकरेंवर अनेक गंभीर आरोपही झाले. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
रागयडमध्ये परप्रांतीयांकडून शेतजमिनी विकत घेतल्या जात आहेत. याकडे लक्ष वेधत त्यांनी रायगडवासियांना डोळे आणि कान उघडे ठेवून विचार कऱण्याचा सल्लाही दिला आहे. “कशासाठी महाराजांचे पुतळे ठेवायचे, या गोष्टी शिकवल्या या माणसाने आपल्याला. फारसी शब्द महाराष्ट्रात असू नये यासाठी स्वत:चा शब्दकोश काढणारा हा माणूस ज्याने मराठी भाषेत बोलले पाहिजे हे सांगितलं त्या महाराष्ट्रात आम्ही आमच्या भाषा विसरतोय जमिनी घालवतोय आमचं सत्त्व घालवतोय आमचा स्वाभिमान घालवतोय, तुम्ही जिवंत प्रेतांसारखी माणसं होऊ नका. हा देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे. तुम्ही जिवंत असलं पाहिजे, तुम्ही मोठे झाले पाहिजेत पण महाराष्ट्र विकून मोठे होऊ नका, इतरांच्या आहारी जाऊन जमिनी विकू नका.
तिसरे महायुद्ध भडकणार? अमेरिकेच्या अणु पाणबुड्या रशियाच्या निशाण्यावर; आता काय करणार ट्रम्प?
तुम्ही महाराष्ट्रावर बोलत असता, तिथे गुजरातमध्ये दोन वेळा बिहाऱ्यांना हाकलून दिलेलं आहे. पहिल्या वेळी २० हजार लोकांना हाकलून दिले. एका अल्पेश ठाकूर नावाच्या तरूणाने आंदोलन केलं त्यावेळी २० हजार बिहारी हाकलून दिले गेले. त्यानंतर भाजपने त्यालाच आमदारकीसाठी त्यांच्या पक्षातून तिकीट दिले आणि तो निवडणूक जिंकलाही. म्हणजे २० हजार बिहाऱ्यांना हाकलून देणाऱ्या अल्पेश ठाकूरचा सत्कार होत असेल तर राज ठाकरे बोलतो तर तो संकुचित देशद्रोही कसा असू शकतो. आतापण गुजरातमधून बिहाऱ्यांना हाकलून दिलं आहे. ते त्यांच्या राज्यात कसे राहत आहेत ते बघा आणि हे आमच्या राज्यात गोंधळ घालायला येत आहेत. या सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत. ”
या राज्यात कोणत्या प्रकारची प्रगती होते. कुठून रस्ते निघणार आहेत ते फक्त मंत्र्यांनाच माहिती असते. का तेच ठरवणार रस्ता व्हायच्या आधी तेच जमिनी घेणार आणि मग या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि गब्बर होणार. त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर पैसे फेकून मारणार आणि त्या जोरावर तुमच्याकडून मतं घेणार, एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे. कुणी खोलात जाऊन विचार करायला तयार नाही. सर्वाधिक डान्सबार रायगड जिल्ह्यात, ते बंद झाले होते ना, मग रायगडमध्ये एवढे अनधिकृत डान्सबार कुठून आले, ते कुणाचे तर अमराठी लोकांचे. हा रायगड जिल्हा आहे ना, आमच्या शिव छत्रपतींची राजधानी आहे ना इथे, कल्याणच्या सुभेदाराची खणा नारळानी ओटी भरून त्याला परत पाठवणारा राजा. त्याची राजधानी इथे असताना त्याच रायगडमध्ये डान्सबार सुरू आहेत. तुम्हाला भरकटवून टाकायचं. मुळ मुद्द्यांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे, वेगळेच विषय आणायचे.
IND vs ENG 5th Test : इंग्लंडमध्ये डीएसपी सिराजचा जलवा कायम! मोडला ‘क्रिकेटच्या देवा’चा विक्रम; वाचा
कालच मला कुणीतरी सांगितलं की महाराष्ट्र राज्य गुजरात साहित्य संम्मेलन भरवत आहे. व्यापाऱ्यांच्या चोपड्यांमध्ये लक्ष गेलं तर जास्त बरं होईल. पण हे काय चालू आहे, मराठी आणि गुजराती माणसाची इथे लागलीच पाहिजे, भांडण व्हावीत. त्यातून आपण मते कशी काढू शकतो, यासाठी हे उद्योग सुरू आहेत. बाकी काही नाही. त्यांना वाटलं होतं. संजय राऊत, राज ठाकरे त्यावर काही रिअॅक्ट करतील, पण आम्ही होणार नाही. आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू. ज्यावेळी समजेल तुमच्या कृतीतून मराठी माणसाच्या अंगाला नख लागतंय त्यावेळी अंगावरच येऊ, आज तुमच्यासमोर आलोय कान डोळे बंद ठेवू नका, लक्ष ठेवा, तरूण तरूणींना माझी विनंती आहे, लक्ष ठेवा, तुमची जमीन विकली जात आहे. उद्या तुमची भाषाही निघून जाईल. कालांतराने पश्चातापाचा हात डोक्यावर मारून घेण्याची वेळ येईल.






