
फोटो सौजन्य - Social Media
राज्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वाढता तुटवडा तसेच दरवाढीच्या पार्श्वभूमीवर Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) महिला आघाडी आक्रमक झाली आहे. यासंदर्भात तालुकाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
सणासुदीच्या काळात, विशेषतः गुढीपाडवा आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडरचा गंभीर तुटवडा निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सिलिंडर बुक केल्यानंतर वेळेवर ओटीपी न मिळणे, बुकिंग प्रक्रिया सुरळीत न चालणे यामुळे नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. त्याचबरोबर अधिकृत मार्गाने गॅस उपलब्ध नसताना अतिरिक्त दोन ते अडीच हजार रुपये दिल्यास सिलिंडर सहज मिळत असल्याचे प्रकार समोर येत असून, मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचेही नमूद करण्यात आले.
दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात करण्यात आलेली ६० रुपयांची वाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी ठाम मागणी महिला आघाडीने केली आहे. तसेच व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉटेल, खानावळ आणि लघुउद्योजकांवर गंभीर परिणाम झाला असून, हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
यावेळी अनिता जाधव, भावना पाटील, स्मिता वराडे, अर्चना शेळके, सुनंदा खरात, रत्ना शेळके, पूजा शिंगणे, रोशनी गरड, अश्विनीत फदाट, आम्रपाली कंकाळ, शालिनी जाधव, शितल सुरडकर, वंदना मेढे, कविता पवार, नितात चव्हाण, वैशाली मिसाळ, सुनिता सुरडकर, सुवर्णा जाधव, सविता राऊत, सुनिता दराखे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होत्या. महिला आघाडीने सरकारकडे गॅस पुरवठा सुरळीत करणे, बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, काळाबाजार रोखण्यासाठी कठोर कारवाई करणे, व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्ववत करणे तसेच बाधित व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.