
फोटो सौजन्य - Social Media
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील मेहा गावातील कडू कुटुंबाने नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलण्यात आल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक व आर्थिक तणावामुळे आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचा गंभीर दावा केला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भास्कर विनायक कडू (वय ७०), त्यांची पत्नी ललिता कडू आणि सून अनुराधा प्रफुल्ल कडू यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शेतालगत अनेक वर्षांपासून असलेल्या नैसर्गिक नाल्याचा मूळ प्रवाह रोखण्यात आला किंवा बदलण्यात आला. त्यामुळे पावसाचे पाणी नदीकडे न वाहता थेट त्यांच्या शेतात साचू लागले, ज्याचा शेती उत्पादनावर आणि कुटुंबाच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला.
कुटुंबाचा आरोप आहे की, या प्रकरणात महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी चुकीचा स्थळ पाहणी अहवाल तयार केला. त्या अहवालाच्या आधारे तहसील स्तरावरही चुकीचे आदेश देण्यात आले. संबंधित गैरअर्जदार आणि काही अधिकाऱ्यांच्या कथित संगनमतामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमुळे कुटुंबावर मोठा मानसिक, सामाजिक आणि आर्थिक ताण निर्माण झाला. त्यातूनच प्रफुल्ल भास्कर कडू यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. निवेदनात या घटनेचे वर्णन शेतीतील नुकसान, आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावातून घडलेली दुर्दैवी मानवी शोकांतिका असे करण्यात आले आहे.
कडू कुटुंबाने प्रशासनाकडे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. नव्याने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पूर्वीच्या अहवालांची आणि आदेशांची तपासणी करण्यात यावी तसेच वस्तुस्थितीच्या आधारे नवीन निर्णय घेण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे.
याशिवाय, या प्रकरणात जबाबदार असलेल्या संबंधितांवर योग्य कारवाई करून कुटुंबाला न्याय मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. कुटुंबाने प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, या कालावधीत ठोस पावले न उचलल्यास पुढील आंदोलनाचा इशाराही दिला आहे.