
31 मार्चपूर्वी पीककर्ज भरल्यास शून्य टक्के व्याज; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
पुणे : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे, खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये घेतलेल्या पीककर्जाची ३१ मार्चपूर्वी परतफेड केल्यास शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (पीडीसीसी) मार्फत देण्यात आलेल्या या कर्जाच्या वेळेत परतफेडीचे आवाहन बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले आहे.
पीडीसीसी बँकेला यंदाच्या खरीप हंगामासाठी २०६४ कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, बँकेने हे उद्दिष्ट ओलांडत २४९० कोटी रुपयांचे, म्हणजेच सुमारे १२० टक्के कर्जवाटप पूर्ण केले आहे. दरम्यान, ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेअंतर्गत शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी कर्जाची परतफेड करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : Chandrapur News: चंद्रपुरात गॅस सिलिंडर टंचाई तीव्र! युद्धामुळे नागरिकांचा बायोगॅस-केरोसिनकडे कल, चुली पुन्हा पेटल्या
याशिवाय, राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६’ अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहनपर योजनेत ५० हजार रुपयांपर्यंत लाभ मिळविण्यासाठीही पात्र ठरता येणार असल्याची माहिती दुर्गाडे यांनी दिली.
50 टक्के वाटा जिल्हा बँकेचा
जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँका, खासगी व व्यापारी बँका, ग्रामीण बँक आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप केले जाते. गतवर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी वार्षिक पतआराखड्यानुसार हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांना सुमारे ६ हजार ३७० कोटी रुपयांइतके पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी पन्नास टक्के वाटा हा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा होता.
हेदेखील वाचा : ऊस बिले थकवणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा; 1 एप्रिलला होणार जनसुनावणी