
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
भारतीय चित्रपटसृष्टीत जेव्हा भव्य चित्रपटांचा विषय निघतो, तेव्हा संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’चं नाव आवर्जून घेतलं जातं. १२ जुलै २००२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर कलात्मक मांडणी, सेट्स, वेशभूषा आणि संगीताच्या बाबतीतही नवा मापदंड निर्माण केला. प्रदर्शनाला २४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या चित्रपटामागील काही रंजक गोष्टी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
त्या काळात ५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘देवदास’ हा भारतातील सर्वाधिक खर्चिक चित्रपट मानला जात होता. विशेष म्हणजे, चित्रपटासाठी उभारण्यात आलेल्या भव्य सेट्सवरच जवळपास २० कोटी रुपये खर्च करण्यात आले. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी तयार केलेले राजेशाही सेट आजही सिनेरसिकांच्या स्मरणात आहेत.
चित्रपटातील कलाकारांच्या वेशभूषेवरही तितकीच मेहनत घेण्यात आली होती. ‘पारो’च्या भूमिकेसाठी ऐश्वर्या राय बच्चनच्या साड्या खास कोलकात्यातून मागवण्यात आल्या होत्या. तर ‘चंद्रमुखी’च्या भूमिकेसाठी माधुरी दीक्षितने परिधान केलेला प्रसिद्ध लेहेंगा तब्बल ३० किलो वजनाचा होता. नृत्य करताना अडचणी येत असल्याने त्याचे वजन नंतर 16 किलो करण्यात आले.
चित्रपटातील प्रत्येक फ्रेम चित्रासारखे दिसावे, यासाठी प्रकाशयोजना आणि छायांकनावरही विशेष लक्ष देण्यात आले. काही दृश्यांच्या चित्रीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर जनरेटर्सचा वापर करण्यात आला होता. शूटिंगदरम्यान सेटवर आग लागण्याच्या दुर्घटनाही घडल्या, ज्यात काही क्रू सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रभावी अभिनयामुळे ‘देवदास’ आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. दोन दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही या चित्रपटाची भव्यता, गाणी आणि संवाद प्रेक्षकांच्या मनात तितक्याच ताकदीने जिवंत आहेत.