
फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत असलेला आणि तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘ईठा’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी चित्रपटाच्या नावासह काही दृश्यांवर आक्षेप घेत निर्मात्यांसमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. या मागण्यांकडे ३ जुलैपर्यंत लक्ष दिले नाही, तर न्यायालयीन मार्ग अवलंबण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
विठाबाई नारायणगावकर यांचे पुत्र कैलास नारायणगावकर आणि नातू मोहित नारायणगावकर यांनी एका मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, विठाबाई यांच्या आयुष्यावर चित्रपट तयार होत असल्याचा आनंद आणि अभिमान आहे. मात्र, चित्रपटाच्या निर्मितीपूर्वी किंवा चित्रीकरणादरम्यान कुटुंबीयांशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आला नाही. त्यामुळे विठाबाईंच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना आणि वास्तव चित्रपटात अधिक प्रभावीपणे मांडण्याची संधी गमावली गेली, असे त्यांनी म्हटले. टीझरमधील काही दृश्यांवरही त्यांनी आक्षेप घेतला आहे. स्टेजच्या मागे बाळाचा जन्म झाल्याचे दाखवण्यात आले असून, अशा संवेदनशील प्रसंगांबाबत कुटुंबीयांकडून खात्री करून घेणे आवश्यक होते, असे कैलास नारायणगावकर यांनी सांगितले. विठाबाईंचा संघर्ष मोठ्या पडद्यावर पोहोचत असल्याचा आनंद असला, तरी त्याचे वास्तवाशी सुसंगत चित्रण होणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
चित्रपटाच्या शीर्षकाबाबतही कुटुंबीयांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ग्रामीण भागात ‘विठा’चा उच्चार ‘ईठा’ असा केला जात असला, तरी नव्या पिढीला विठाबाईंची खरी ओळख समजण्यासाठी त्यांच्या पूर्ण नावाचा उल्लेख होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटाचे नाव बदलून ‘विठा’ करावे किंवा उपशीर्षकात ‘विठाबाई नारायणगावकर’ असे संपूर्ण नाव द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. याशिवाय, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो कुटुंबीयांना दाखवावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. चित्रपटात काही तथ्यात्मक चुका किंवा आक्षेपार्ह बाबी आढळल्यास त्या वेळेत दुरुस्त करता येतील, असे त्यांचे म्हणणे आहे.
मोहित नारायणगावकर यांनी सांगितले की, या सर्व मागण्या ई-मेलद्वारे चित्रपटाच्या निर्मात्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. तसेच विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित प्रकाशित झालेल्या एका पुस्तकातील अनेक माहिती ऐकीव असल्याचा दावाही त्यांनी केला. त्या पुस्तकाचा आधार घेऊन चित्रपट तयार करण्यात आला असेल, तर इतिहासाचे चुकीचे चित्रण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित करत सांगितले की, विठाबाई ज्या तमाशा फडाशी संबंधित होत्या, त्याचे मूळ नाव ‘भाऊ बापू नारायणगावकर’ असे होते. मात्र, चित्रपटात त्याचा अपूर्ण उल्लेख करण्यात आल्याने मूळ इतिहासाला धक्का बसू शकतो, असे त्यांचे मत आहे.
निर्मात्यांकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती देत मोहित नारायणगावकर यांनी २ ते ३ जुलैपर्यंत संपर्क न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. या संदर्भात कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. “चित्रपट चांगला असेल, तर आम्ही त्याचे स्वागतच करू. मात्र, विठाबाई नारायणगावकर यांच्या इतिहासाचे चुकीचे किंवा आक्षेपार्ह चित्रण झाल्यास आम्ही शांत बसणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.