
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भारतामध्ये वाढती पाणीटंचाई, प्रदूषित नद्या आणि अनियमित पाणीपुरवठा ही गंभीर समस्या बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर National Water Mission आणि Ministry of Jal Shakti यांनी ‘जल वाणी’ हा जनजागृती उपक्रम सुरू केला आहे.या देशव्यापी मोहिमेत ‘मिर्ची’च्या सहकार्याने नागरिकांना दररोजच्या छोट्या कृतींमधून पाणी वाचवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. घरातील नळ वेळेवर बंद ठेवणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, पावसाचे पाणी साठवणे अशा साध्या सवयींमधून मोठा बदल घडवता येऊ शकतो, हा या मोहिमेचा मुख्य संदेश आहे.
या उपक्रमाला गायक Mohit Chauhan, अभिनेत्री Taapsee Pannu आणि दिग्दर्शक Anubhav Sinha यांचा पाठिंबा लाभला आहे. त्यांच्या माध्यमातून पाणी संवर्धनाचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
याबतीत गायक मोहित चौहान म्हणाले, “पाणी ही अशी गोष्ट आहे की, त्याची कमतरता जाणवली की आपण पाण्याला गांभीर्याने घेतो. ‘जल वाणी’चा भाग होताना मला लोकांना आठवण करून देता आली की प्रत्येक कृती महत्त्वाची असते. नळ बंद करणे, प्रत्येक थेंब जपणे किंवा आजूबाजूच्या पाण्याच्या अपव्ययाकडे लक्ष देणे. या छोट्या कृतींतूनच मोठी जाणीव निर्माण होते. माझा आवाज लोकांना थांबून विचार करायला आणि कृती करायला प्रेरणा देईल, अशी आशा आहे. जल शक्ती मंत्रालय आणि मिर्ची यांनी हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल मला आनंद आहे.” अभिनेत्री तापसी पन्नू यांनीही सामूहिक जबाबदारीवर भर देत सांगितले, “पाणी संवर्धन हा फक्त धोरणांचा विषय नाही, तर प्रत्येकाने स्वीकारायची वैयक्तिक जबाबदारी आहे. आज आपण वाचवलेला प्रत्येक थेंब म्हणजे पुढील पिढ्यांसाठी दिलेले आश्वासन आहे.”
दिल्लीमध्ये ‘जल वाणी’ मोहिमेअंतर्गत एक वेगळा आणि विचार करायला लावणारा प्रयोग करण्यात आला. National Water Mission आणि Ministry of Jal Shakti यांच्या सहकार्याने ‘मिर्ची जल वाणी’ मोहिम राबवली जात आहे.या मोहिमेत आरजे नवेद यांनी गजबजलेल्या ठिकाणी मुद्दाम एक नळ गळत ठेवला. अनेक लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र काही जण थांबले आणि त्यांनी तो नळ बंद केला. या छोट्या पण महत्त्वाच्या कृतीसाठी त्यांना ‘जल वॉरियर्स’ म्हणून सन्मानित करण्यात आले. या प्रयोगातून रोजच्या छोट्या कृतींमधूनही जागरूकता कशी दिसून येते, हे अधोरेखित झाले.
मोहिमेत सहभागी झालेल्या वॉटर वॉरियर्सनी सांगितले की, भारतातील पाण्याची समस्या ही वर्षानुवर्षे वाढलेला वापर, प्रदूषण आणि निसर्गाच्या मर्यादांकडे दुर्लक्ष यामुळे निर्माण झाली आहे. हा प्रश्न केवळ पाण्याच्या उपलब्धतेचा नसून, लोकांच्या विचारसरणी आणि जबाबदारीचाही आहे. सरकार योजना आखू शकते, नियम बनवू शकते; पण पाणी ही मर्यादित आणि सर्वांची समान संपत्ती आहे, ही जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.
आरजेच्या माध्यमातून तयार केलेल्या डिजिटल कंटेंटद्वारे ही मोहीम विशेषतः शहरांतील तरुणांपर्यंत पोहोचवली जात आहे. ‘जल वाणी’च्या माध्यमातून नागरिकांना पाणी हे मौल्यवान संसाधन आहे आणि ते जपून वापरणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश दिला जात आहे.