
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
प्रसिद्ध आणि ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना १७ फेब्रुवारी २०२६ पासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नियमितपणे त्यांची भेट घेत आहे. रुग्णालयाबाहेर अनेक कलाकार देखील त्यांच्या भेटीसाठी उपस्थितीत झालेले दिसले. अनेकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना देखील केली. आणि आता त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत असल्याचे वृत्त आहे. जर ही सुधारणा अशीच राहिली तर त्यांना या आठवड्यात डिस्चार्ज दिला जाईल,आणि ते लवकर घरी परततील असे वृत्त आहे.
करण जोहरच्या ‘Dostana 2’ला मोठा धक्का! कार्तिक आर्यननंतर लक्ष्यची चित्रपटामधून एक्झिट
पत्रकार विकी लालवाणी यांनी वृत्त दिले की सलीम खान यांना सौम्य मेंदू रक्तस्त्राव झाला होता, त्यानंतर त्यांना दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले आणि या काळात ते तज्ञांच्या पथकाच्या देखरेखीखाली होते. आता, अहवालांनुसार, ते बरे होत असल्याचे समजले आहे. त्यांच्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा जास्त सुधारणा दिसून येत आहे. जर हे असेच चालू राहिले तर डॉक्टर त्यांना ३-४ दिवसांत घरी जाण्याची परवानगी देणार आहेत.
सलीम खान यांच्यासाठी चाहत्यांनी केली प्रार्थना
सलीम खान ८८ वर्षांचे आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याच्या बातमीने खान कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. विकी लालवाणी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले की, गेले काही दिवस कुटुंबासाठी कठीण होते, परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सर्वजण त्यांच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करत आहेत. आमिर खान, डेझी शाह आणि इतरांनीही प्रार्थना केली आहे.
आमिर खानने सलीम खान यांच्या प्रकृतीची दिली माहिती
आमिर खानने एका मीडिया मुलाखतीत सांगितले की, “मी सलीम साहेबांना भेटायला गेलो होतो. आम्ही सर्वजण त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत. ते आयसीयूमध्ये होते, त्यामुळे मी त्यांना वैयक्तिकरित्या भेटू शकलो नाही, पण मी त्यांच्या कुटुंबासोबत बसलो होतो.” सलीम खान यांच्याबद्दल सांगायचे झाले तर, त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात दोन लग्न केले आहे. त्यांनी पहिले लग्न सुशीला चरकशी केले, ज्यांचे नाव लग्नानंतर सलमा असे बदलण्यात आले. त्यानंतर त्यांनी हेलनशी लग्न केले. त्यांना पाच मुले आहेत, मुली अलविरा आणि अर्पिता आणि मुले सलमान, अरबाज आणि सोहेल. ते सर्व एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.