मुंबई : वादग्रस्त विधान करून चर्चेत येणाऱ्या अभिनेत्रींनमध्ये मराठी मालिका विश्वातील अभिनेत्री केतकी चितळें ही एक आहे. केतकी अनेकदा तिच्या परखड भूमिका आणि वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकत असते. अशातच केतकीने पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
केतकीला टीका करण्यासाठी कोणताही विषय पुरेसा ठरतो, ती कोणत्याही विषयावर अधिकारवाणीनं कुणालाही तितक्याच अधिकारानं बोलू शकते असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच की तिच्या पोस्टला मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. आता केतकीनं थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. केतकीनं भलेही त्यांच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी तिच्या बोलण्याचा रोख कुणाकडे आहे याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी एक विधान केले होते. “आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत” असी त्यांनी म्हंटले होते. हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्या त्या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या. आता त्यावर केतकीनं एक पोस्ट शेयर करत तिची भूमिका मांडली आहे.
केतकीनं अमृता फडणवीसांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ती म्हणते, जुनं आणि नव यावरुन जे काही समोर येते आहे ते जुनेच झाले आहे. जसं की, नवीन राष्ट्रपिता हा वाद आता जुना होतोय. भारत देश हा प्रत्येक सेकंदाला बदलतोय आणि आता आपण स्वत:लाही बदलायची वेळ आलेली आहे. आता ३ हजार वर्षे प्राचीन गोष्टींची व्याख्या करायची झाल्यास शंभर वर्षांची झाली आहे. आणि हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे असे केतकीने म्हटले आहे.