फोटो सौजन्य - Social Media
‘आमने सामने’, ‘इवलेसे रोप’, ‘तू अभी तक है हसीन’ अशा लोकप्रिय नाटकं, मालिका आणि वेब सिरीजमधून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी जोडी म्हणजे लीना भागवत आणि मंगेश कदम. त्यांच्या अप्रतिम टायमिंग आणि हसवणाऱ्या केमिस्ट्रीमुळे ही जोडी रंगभूमीवर आणि छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून बसली आहे. आता हीच जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार असून, ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
प्रत्यक्ष आयुष्यात पती-पत्नी असलेले लीना आणि मंगेश पडद्यावर देखील एकमेकांना नेहमीच उत्तम साथ देताना दिसले आहेत. त्यामुळे या चित्रपटात त्यांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या अनुभवाबद्दल बोलताना लीना भागवत म्हणाल्या, ” मराठी प्रेक्षकांनी आम्हाला रंगभूमीवर नेहमीच प्रचंड प्रेम दिलं. आता पहिल्यांदाच आम्ही ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहोत. यासाठी प्रेक्षकांप्रमाणे आम्हीही उत्सुक आहोत. पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र काम करणं ही नवी आणि सुंदर अनुभूती आहे. मला खात्री आहे प्रेक्षक आम्हाला मोठ्या पडद्यावरही तेवढंच प्रेम देतील.”
मंगेश कदम म्हणाले, “नाटक आणि चित्रपटाचा अनुभव वेगळा असतो. मात्र लीनासोबत स्क्रीन शेअर करणं हे नेहमीच मजेशीर आणि समाधानकारक असतं. ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट आमच्यासाठीही खास आहे, कारण यात आमची जोडी एका वेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे.” या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले असून, निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब यांसारखे दमदार कलाकार देखील झळकणार आहेत.
‘स्टारलाईट बॉक्स थिएटर्स’ आणि ‘नितीन वैद्य प्रॉडक्शन्स’च्या बॅनरखाली साकारलेला हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट म्हणजे एक मोठं सरप्राईज ठरणार आहे.