अभिनेता सुव्रत जोशीने शेअर केला कॅबमधील अनुभव, फोटो शेअर करत म्हणाला...
‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून अभिनेता सुव्रत जोशीला चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. सुव्रत जोशीने आपल्या प्रेक्षकांचे मराठी टेलिव्हिजन, चित्रपट, नाटक आणि वेबसीरीजच्या माध्यमातून मनोरंजन केले आहे. सध्या सुव्रत ‘वरवरचे वधू-वर’ नाटकामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये या नाटकाचे हाऊसफुल्ल प्रयोग सुरू आहेत. सध्या मुंबईमध्ये या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. या नाटकानिमित्त अभिनेत्याला एक वेगळाच अनुभव आला आहे, तो अनुभव अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितला आहे.
हे देखील वाचा – विजय ‘थलापती 69’ साठी घेणार ‘इतकं’ मानधन, किंग खान आणि भाईजानलाही टाकलं मागे
विराजस कुलकर्णी दिग्दर्शित ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाचे सध्या मुंबईमध्ये प्रयोग सुरू आहेत. याच नाटकाच्या प्रयोगासाठी जात असताना सुव्रतला कॅबमध्ये एक वेगळाच अनुभव आला. हा अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेता सुव्रत जोशीने कॅब चालकाचा फोटो शेअर करत आपला अनुभव शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुव्रत म्हणतो, “काल ( १४ सप्टेंबर ) ‘वरवरचे वधू-वर’या आमच्या नाटकाचा दादरच्या शिवाजी मंदिर येथे प्रयोग होता. गणेशोत्सवामुळे दादर भागात गर्दी असणार हे अपेक्षित होतं म्हणून कॅबने जायचा विचार केला. उबेरला हे फोटोत दिसणारे सचिन भाऊ चालक म्हणून आले. त्यांनी बसल्या बसल्या माझ्याकडे बघून स्तिमित झाले आणि एक छान छान सुहास्य देऊन ओटीपी विचारला.”
“मग काही वेळाने सभ्यपणे त्यांनी मला ओळखल्याचे आणि त्यांना माझे काम आवडत असल्याचे सांगितले. पण मग लगेचच त्यांनी तुमचे नवे नाटक “वरवरचे वधू-वर”पाहायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. हे ऐकून मात्र मी हरखून गेलो. नाटकाचा शुभारंभ झाल्यापासून ते आणि त्यांची पत्नी नाटकाला येण्यासाठी सोयीस्कर दिवस शोधत आहेत. दोघेही काम करतात आणि त्यांची कन्या अगदी लहान असल्याने अजून जमले नाही. मग मात्र मी त्यांना आग्रह धरला की चला आताच प्रयोगाला बसा. त्यांच्या पत्नीला त्यांनी व्हिडिओ कॉल लावला. साधेसे घर आणि निगुतीने सजवलेला बाप्पा पार्श्वभूमीवर होते. मी त्यांनाही आमंत्रण केले. पण घरी बाप्पा आणि मुलगी असल्याने आज जमत नसल्याचे वहिनींनी सांगितले.”
“त्यांच्या घरातील बाप्पाचे आणि चिमुकलीचे दर्शनही व्हिडिओ कॉलवर झाले. सचिन भाऊ तुम्ही तुमच्या सोयीने प्रयोगाला यालच, पण हा प्रसंग मला कलाकार म्हणून खूप काही देऊन गेला. मराठी नाटक हे प्रत्येक व्यवसायातील, विविध पार्श्वभूमी असलेल्या मराठी माणसाला पहावेसे वाटते ही फार दुर्मिळ आणि महत्त्वाची गोष्ट आहे. मध्यंतरी आमच्या एका प्रयोगाला एका फार मोठ्या पदावरचे सचिव गुपचूप तिकिट काढून नाटक बघून गेले आणि आता सचिन भाऊ पण येतील. मी जगभर नाटकाचे प्रयोग पाहिले. मी हिंदी नाटकाचे प्रयोग पृथ्वी थिएटर,NCPA आणि भारतभर केले. पण विशिष्ट कलाव्यवहार हा विशिष्ट वर्गापर्यंत मर्यादीत राहतो असाच माझा अनुभव. शेकस्पियर काळात कष्टकरी ते जमीनदार globe थिएटर मध्ये नाटक बघायला एकत्र यायचे.”
“मराठी नाटक हे त्या कुळातील पण त्याचेच जिवंत,प्रवाही प्रारूप आहे की काय असे वाटून गेले. अर्थात याचे संपूर्ण श्रेय इथे होऊन गेलेल्या आमच्या दिग्गजांना आहे. आणि आताही भरत जाधव सर,प्रशांत दामले सर तर प्रायोगिक रंगभूमीवर अतुल पेठे यांसारख्या अनुभवी कलाकारांना आहे. त्यांचे नाटक हे भौगोलिक, सांस्कृतीक आणि आर्थिक स्तर चिरून जायचा प्रयत्न सतत करत असते. यातून जबाबदारीची जाणीव खूप वाढली. प्रत्येक माणूस नाटक बघायला येतो तेव्हा तो त्याच्या कष्टाची कमाई आपल्या प्रति खर्च करत असतो. त्यामुळे आपले सगळे बाजूला सारून त्याला एक उत्तम प्रयोग नाही देऊ शकलो तर तो नैतिक अपराध असेल असेच वाटून गेले.”
“नाट्यशास्त्र म्हणते की नाटक हे डोळे आणि कानांनी करायचा यज्ञ आहे. मी पुढे जाऊन म्हणेन की आम्ही नटानी तर सर्व इंद्रिये या आहुतीमध्ये ओतली पाहिजेत. आमचे पडद्यामागचे कलाकार त्यांच्या घामाचे धृत यात टाकतात. तसेच प्रेक्षकही यात आपल्या वेळेचे,मनाचे ,इंद्रियांचे अर्घ्य देत असतो. यातून पेटलेला हा नाट्ययज्ञ हा हिवाळी रात्री पेटवलेल्या शेकोटीप्रमाणे सर्व रसिकांना ऊब देत राहो अशी सदिच्छा.”