
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
ग्रामीण महाराष्ट्रातील गप्पा, अफवा आणि छोट्या-मोठ्या चर्चांच्या रंगतदार दुनियेला हलक्या-फुलक्या विनोदी शैलीत उलगडणारा ‘भागूबाई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले असून, २४ एप्रिल २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. पोस्टर पाहताच चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
मोशन पोस्टरमध्ये ‘भागूबाई’चा खोडकर आणि गमतीशीर अंदाज पाहायला मिळतो. ओठांवर बोट ठेवत ‘श्श…’ असा इशारा करणारी तिची शैली आणि तिच्यामुळे गावात पडलेली फूट याचे संकेत पोस्टरमधूनच मिळतात. यामुळे हा चित्रपट केवळ विनोदी नसून त्यात काहीतरी रहस्य आणि नाट्यमय वळणही दडलेलं असल्याचं स्पष्ट पाहायला मिळणार आहे.
चक्क चक्कीत दळला मृतदेह! तुंरुगात झालेला खून अन् त्या मागचा थरार; ‘या’ सिनेमामुळे Netflix चर्चेत
काय आहे चित्रपटाची कथा?
‘भागूबाई’ ही कथा आहे एका अशा बाईची, जिला गावातील गप्पा, कुचाळक्या आणि अफवांमध्ये विशेष रस असतो. तिच्या या स्वभावामुळे गावात अनेक घटना घडत राहतात. मात्र तिच्या आयुष्यात अचानक घडणारी एक अनपेक्षित घटना सगळंच चित्र बदलून टाकते आणि कथा एका वेगळ्याच दिशेने पुढे जाते. अशातच आता ही चित्रपटाची कथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटात निर्मिती सावंत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासोबत भार्गवी चिरमुले, शशांक शेंडे, मंगेश देसाई, विजय पाटकर, नागेश भोसले आणि निखिल चव्हाण यांसारखे दमदार कलाकार देखील दिसणार आहेत. त्यांच्या अभिनयामुळे चित्रपटाला अधिक रंगत येणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती श्रद्धा पटेल यांनी केली असून दिग्दर्शन संजय अमर यांनी केली आहे. दिग्दर्शक संजय अमर यांच्या मते, ‘भागूबाई’ हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रातील साध्या माणसांच्या आयुष्याचं वास्तव आणि त्यांच्या भावनांचं मनापासून केलेलं चित्रण आहे. आजच्या वेगवान डिजिटल युगातही हा चित्रपट प्रेक्षकांना अस्सल आणि निरागस आयुष्याची जाणीव करून देणार आहे.
प्रिन्स नरूलावर गाणं चोरल्याचा आरोप; ‘Ruffle Dunali’ ऑडिओ लीक करत आर्टिस्टचा मोठा खुलासा
निर्माती श्रद्धा पटेल यांनीही या चित्रपटाबद्दल सांगताना म्हंटले की, ‘भागूबाई’ हा केवळ मनोरंजन करणारा चित्रपट नसून तो प्रेक्षकांना जोडून ठेवणारा आणि एक अर्थपूर्ण संदेश देणारा आहे. वेगळा विषय आणि दमदार कलाकार यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असा त्यांना विश्वास आहे. हास्य, नातेसंबंध आणि दडलेलं सत्य यांचा सुंदर मिलाफ असलेला ‘भागूबाई’ हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळाच, मजेदार आणि विचार करायला लावणारा अनुभव देण्यासाठी सज्ज झाला आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित असलेली ही कथा प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच अंतर्मुखही करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.