
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून ‘तुलसी’ म्हणून घराघरांत पोहोचलेल्या स्मृती इराणी यांनी अभिनयापासून राजकारणापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पार पाडला आहे. आता त्यांच्या या बहुआयामी योगदानाची दखल घेत फॉर्च्युन मासिकाने त्यांना ‘100 Most Powerful Women’ (100 सर्वात प्रभावशाली महिला) या प्रतिष्ठित यादीत स्थान दिले आहे.
स्मृती इराणी यांनी भारतीय मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. भारत सरकारमध्ये त्यांनी महिला व बालविकास, अल्पसंख्याक व्यवहार, वस्त्रोद्योग, माहिती व प्रसारण आणि मानव संसाधन विकास यांसारख्या महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या नेतृत्वशैली, जनसेवा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा या प्रतिष्ठित यादीत समावेश करण्यात आला आहे.
फॉर्च्युनच्या यादीत स्थान मिळाल्यानंतर स्मृती इराणी यांनी जगभरातील महिलांना प्रेरणादायी संदेश दिला. त्या म्हणाल्या, “प्रत्येक महिलेसाठी माझा संदेश स्पष्ट आहे—तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण आहात. महिला स्वतःसाठी उंच निकष ठरवतात, स्वतःशीच स्पर्धा करतात आणि सतत पुढे जात राहतात. उर्वरित जग त्यांच्या बरोबरीने येण्याचा प्रयत्न करत असते.”
अभिनय, राजकारण आणि सामाजिक नेतृत्व या तिन्ही क्षेत्रांत प्रभावी कामगिरी करणाऱ्या स्मृती इराणी यांनी अलीकडेच तब्बल २५ वर्षांनंतर ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. त्यांच्या पुनरागमनाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मालिका टीआरपीमध्येही चांगली कामगिरी करत असल्याची चर्चा आहे.
अभिनेत्री, नेत्या आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अशी बहुआयामी ओळख असलेल्या स्मृती इराणी यांच्या या जागतिक सन्मानामुळे भारतीय महिलांसाठीही हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.