
सिनेमाचं एडिटींग करणाऱ्या त्या पहिला महिला भारतीय होत्या. या सिनेमाच्या शुटींग दरम्यान असलेल्या कलाकारांच्या जेवणापासून ते तांत्रिक बाबींपर्यंत त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. एवढंच नाही तर पहिल्या सिनेमासाठी दादासाहेबांना पैशांची चणचण भासायला लागली. त्यावेळी मागचा पुढाकार कसलाही विचार न करता सरस्वतीबाईंनी दागिने विकले.आणि भांडवल उभं केलं.
तो काळ आणि आजचा काळ यात फरक जरी खूप असला तरी सरस्वतीबाईंचं श्रेय मोठं आहे. आजच्या काळात आपण सिनेमा पाहताना अनेक तांत्रिकबाबी पाहत असतो. पण त्या काळी हे एडिटींग कसं करण्यात आलं आणि सरस्वती बाईंनी ही जबाबदारी लिलया कशी पेलली ते जाणून घेऊयात.
केमिकल्समध्ये फिल्मचे रोल वाळवण्याचं काम स्वत: सरस्वतीबाई करत होत्या. यानंतर सिक्वेलनुसार फिल्मच्या रिळ लावण्याचं काम त्या तासन् तास करत होत्या. त्यानंतर प्रत्येक फिल्मची बारकाईने तपासणी करणं या सर्वकामामुळे सिनेमा क्षेत्रातील पहिली महिला एडिटर म्हणून आणि तंत्रज्ञ म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. खरंतर राजा हरिश्चंद्र सिनेमा फक्त दादासाहेबांचा विजय नव्हता तर या सिनेमासाठी सरस्वतीबाईंनी घेतलेले कष्ट देखील मोजमाप करता येणार नाही असे होते. आज सिनेमॅटोग्राफर आणि एडिटर असणं सर्वसामान्य असलं तरी त्याकाळी हे शिवधनुष्य पेलणं महाकठीण काम होतं. तांत्रिक बाबी तर आहेतच पण सामाजात असलेली स्त्रीबाबतच्या मानसिकतेला खतपाणी न घालता सरस्वतीबाईंनी पतीची साथ सोडली नाही. आजंही राजा हरिश्चंद्र सिनेमा सरस्वतीबाईंशिवाय अपूर्णच.