
यासंंदर्भात बोलताना आकाश मोरे म्हणाले की, मला वरिष्ठांचा निर्णय मान्य असेल, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जो निर्णय सांगतील ते करू. पण अद्याप वरिष्ठांसोबत माझा कोणताही संपर्क झालेला नाही. सपकाळ साहेब आणि वडेट्टीवार साहेब जो निर्णय सांगतील तो मला मान्य करावा लागेल. माझे अजून कोणाशीही बोलणे झालेले नाही. सकारात्मक प्रतिसाद असतानाही लोकभावना जपायच्या असतात. लोकांकडून मला सकारात्मक प्रतिसाद आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेला काँग्रेस उमेदवार आकाश मोरे आज आपला अर्ज मागे घेण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारपर्यंत काँग्रेस आपला अधिकृत उमेदवार मागे घेण्याबाबत अंतिम निर्णय जाहीर करेल.
बारामतीची ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गेल्या २४ तासांपासून मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. सुनेत्रा पवार यांनी स्वतः काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधून आणि गाठीभेटी घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही काँग्रेसच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींशी या संदर्भात चर्चा केल्याचे समजते. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून राजकीय संस्कृती जपण्यासाठी ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती केली.
विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “बारामतीतील एकूण परिस्थिती आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उमेदवारी पाहता, आम्ही ही निवडणूक लढवू नये, अशी आमच्या सर्व प्रमुख नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. काल प्रदेशाध्यक्षांसोबत झालेल्या चर्चेतही बहुतेकांनी माघारीची भूमिका मांडली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सध्या केंद्रीय नेतृत्वाशी संपर्कात आहेत. श्रेष्ठींची परवानगी मिळताच आज दुपारपर्यंत अधिकृतपणे अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.”
Viral Video: ड्रेसिंग रूममध्ये David Miller ला कोसळले रडू, तरळले अश्रू; हेमांग बदानीने दिला आधार
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून हातात केवळ काही तास शिल्लक आहेत. जर काँग्रेसने आपला अर्ज मागे घेतला, तर सुनेत्रा पवार यांची विधानसभेवर बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत बारामतीकरांच्या भावनांचा विचार करून हा निर्णय घेतला जात असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.