
रायगडमध्ये भाजपला मिळणार ठाकरेंच्या शिवसेनेची साथ? जिल्हा परिषदेत सत्तेचे नवे गणित
खालापूर / प्रवीण जाधव : जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवून राष्ट्रवादी (अजित पवार गट), भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे) एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या सूचक वक्तव्यामुळे या चर्चांना अधिक वेग आला आहे. रायगडमध्ये वेगळा ‘पॅटर्न’ राबवण्याचे संकेत देत सत्तेच्या समीकरणात मोठा बदल होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने २१ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे. मात्र, बहुमतासाठी आवश्यक आकडा नसल्याने त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
हेदेखील वाचा : महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?
खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, “कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने एकत्र निवडणूक लढवली होती आणि त्यांना मोठे यश मिळाले. त्यामुळे हाच फॉर्म्युला जिल्हा परिषदेतही वापरण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्हा परिषदमधील सत्ता समीकरण असे…
१६ जागा राष्ट्रवादी (अजित पवार गट), १५ जागा भारतीय जनता पक्ष, ३१ जागा (स्पष्ट बहुमत) एकत्रित ताकद
(याशिवाय ठाकरे गटाची साथ मिळाल्यास सत्तास्थापनेसाठी मजबूत आघाडी तयार होऊ शकते.)
अपघाताची चौकशी करा
यावेळी तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत उपस्थित झालेल्या शंकांवरही भाष्य केले. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी राष्ट्रवादीची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Onion Farmers News: कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय