
सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार
Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून मुंबईत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांनी शनिवारी वकिलांच्या टीमसह मातोश्रीवर जात आदित्य ठाकरे यांच्याविरोधातील 500 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची नोटीस दिली. आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी ही नोटीस स्वीकारल्यानंतर आमदार वरुण सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणावर आपली भूमिका मांडली.
वरुण सरदेसाई हे नात्याने आदित्य ठाकरेंचे भाऊ आहेत. त्यांनी सांगितलं की, गेल्या पाच-सहा वर्षांपासून आपण सातत्याने सांगत आलो आहोत की आदित्य ठाकरे हे ना सुशांत सिंह राजपूत यांना ओळखत होते, ना दिशा सालियान यांना. या प्रकरणातून वारंवार वेगवेगळे आरोप करण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलं.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयने केला आणि त्यानंतर क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आल्याचा दाखलाही सरदेसाईंनी दिला. या प्रकरणात अनेक आरोप झाले, मात्र आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिले नसल्याचा दावा त्यांनी केला.
दिशा सालियन प्रकरणाबाबत बोलताना सरदेसाईंनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील तपासाचा उल्लेख केला. त्यानंतर 2022 मध्ये राज्यात सरकार बदललं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना या प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
सरदेसाईंच्या म्हणण्यानुसार, 2023 पासून या SITने प्रकरणाचा तपास केला. ज्यांनी या प्रकरणात आरोप केले, त्यांना चौकशीसाठी बोलावून त्यांच्याकडे असलेले पुरावे सादर करण्यास सांगण्यात आलं. पुढे 14 जून 2026 रोजी SITने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रतिज्ञापत्राचा दाखला देताना सरदेसाई म्हणाले की, पहिल्या सरकारने केलेली चौकशी योग्य असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. तपासात तफावत आढळली नसल्याचाही दावा त्यांनी केला.
दरम्यान, सतीश सालियान यांनी आपलं म्हणणं किंवा स्टेटमेंट योग्य पद्धतीने नोंदवण्यात आलं नसल्याचं म्हटल्यास त्यावरही सरदेसाईंनी प्रतिक्रिया दिली. ‘तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते द्या,’ असं चौकशीदरम्यान सांगण्यात आलं होतं आणि सतीश सालियान यांचं स्टेटमेंट अनेकदा नोंदवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
आता या प्रकरणात सतीश सालियान यांनी दाखल केलेली कायदेशीर नोटीस आणि त्यावर ठाकरे गटाकडून आलेली प्रतिक्रिया यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा उधाण आलं आहे. पुढील कायदेशीर प्रक्रियेत या दाव्यांबाबत नेमकी काय भूमिका समोर येते, याकडे लक्ष लागलं आहे.