
भाजप ठाम, एकनाथ शिंदे नाराज
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच आता महाराष्ट्र विधान परिषदेच्या १७ जागांवर होणाऱ्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे. महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप स्वतः १२ जागांवर निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.
भाजपच्या या भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. ते आपल्या पक्षासाठी किमान ५ जागांची मागणी करत आहेत, परंतु भाजप यासाठी तयार नाही. या सगळ्या वादामुळे शिंदे यांच्या शिवसेनेची राजकीय वर्तुळात बरीच कोंडी होताना दिसत आहे. दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही ३ जागांवर दावा केला आहे. भाजपने शिवसेनेला ३ आणि राष्ट्रवादीला २ जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, हा फॉर्म्युला स्वीकारण्यास विशेषतः शिवसेना अजिबात तयार नाही. असे असले तरी, आपसातील चर्चेतून या मुद्द्यावर तोडगा काढला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
नाशिक, संभाजीनगरवरून पेच
भाजप शिंदे यांच्या शिवसेनेत विधान परिषदेच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे, पुणे जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेससोबतही पेच निर्माण झाला आहे. महायुतीमध्ये १७ जागांसाठी इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे, ज्यामुळे आघाडीमध्ये एकमत घडवून आणताना नेत्यांची मोठी दमछाक होत आहे.
फडणवीस-शिंदे यांच्यात चर्चा
फडणवीस आणि शिंदे यांच्यात सुमारे १५ मिनिटे चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी विधान परिषदेच्या १७ जागांच्या वाटपावर एकमत करण्याचा प्रयत्न केला, परंतु शिंदे आपल्या ५ जागांच्या मागणीवरून मागे हटण्यास तयार नाहीत, अशी माहिती सध्या दिली जात आहे.
महायुतीत विधानपरिषदेचा तिढा कायम
राज्यात आता विधानपरिषद निवडणुकांचे बिगूल वाजले असून, राज्यात एकूण १७ जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची देखील सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपकसून तयारी करत असल्याचे दिसत येत असून, महायुतीत भाजपला १७ जागांपैकी १२ जागा मिळणार असल्याचे समजत आहे. याबाबत महायुतीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र बैठक घेऊन जागावाटप अंतिम करणार आहेत.