
Eknath shinde, uddhav thackeray, sonam wangchuk, cjp, cockroach janata party, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, सोनम वांगचूक आंदोलन, जंतर मंतर आंदोलन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे प्रतिक्रिया, महाराष्ट्र राजकारण, नरेंद्र मोदी, विद्यार्थी आंदोलन
दिल्लीतील जंतर-मंतरवर शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पाठिंबा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर जोरदार टीका केली.
शिंदे म्हणाले, “हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. त्यांचा नेहमीच बाहेरून आणि घरातून पाठिंबा असतो. ‘तुम लढो, हम कपडा संभालते है’ अशी त्यांची भूमिका असते. बुडाला जळत असताना डोंगरावर आग विझवायला धावणाऱ्या माणसासारखी उबाठाची अवस्था झाली आहे.”
एकनाथ शिंदे यांनी आरोप केला की, सरकारविरोधात जेव्हा जेव्हा आंदोलन उभे राहते, तेव्हा उद्धव ठाकरे गट त्याला पाठिंबा देत असतो. श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेशातील आंदोलनांचा उल्लेख करून उबाठा गट मुद्दाम अशी उदाहरणे देत असल्याचाही त्यांनी आरोप केला.
शिंदे म्हणाले की, देशभर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गट स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. देशात अराजकता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा, अशी त्यांची इच्छा असल्याचा आरोपही त्यांनी केला.
त्याचवेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करत, देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे आणि ३२ कोटी नागरिकांना दारिद्र्यरेषेबाहेर आणल्याचा दावा केला.
युवकांचा विश्वास अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असल्याचा दावा करत शिंदे म्हणाले की, २०१४ पूर्वीचे घोटाळे आणि त्यानंतर झालेली विकासकामे युवकांनी पाहिली आहेत. त्यामुळे युवक मोदी सरकारच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली. “आधी हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं, आता रामरक्षा आंदोलन करत आहेत. कितीही हिंदुत्वाचा आव आणला तरी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले तेव्हाच त्यांचे हिंदुत्वही सुटले,” असा टोला त्यांनी लगावला.