
कोल्हापुरात महापौर, उपमहापौर पदासाठी होणार निवडणूक; महाविकास आघाडीकडून 'या' दोन नावांना पसंती
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देत महाविकास आघाडीच्या ८१ पैकी ३५ जागा निवडून आणल्या होत्या. आघाडीने महापौर आणि उपमहापौर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. महापौरसाठी सचिन शेंडे, तर उपमहापौरसाठी दुर्वास कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. असे असताना भाजपच्या वतीने रूपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
येत्या सहा फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर निवड होत आहे. या पार्श्वभूमिवर अजिंक्यतारा कार्यालय येथे महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ऋतुराज पाटील होते. यावेळी महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने महापौर, उपमहापौर लढण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरसेवक राजेश लाटकर यांनी सध्या महाविकास आघाडीकडे ३५ तर महायुतीकडे ४६ असे संख्याबळ आहे. मात्र, त्यांच्यामध्ये नेतेमंडळी आणि नागरसेवकात ताळमेळ दिसत नाही. याचा फायदा आपल्याला होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी, महापौर पदासाठी ओबीसी प्रवर्गातील एकूण आठ नावे वाचून दाखवली. यामध्ये विशाल चव्हाण, विनायक कारंडे, सचिन शेंडे, उमेश पोवार, जयश्री चव्हाण, दिलशाद मुल्ला, प्रतिज्ञा उत्तुरे, पुष्पा नरूटे आदींचा सहभाग होता. या सर्वांना त्यांचे मत विचारण्यात आले. यावेळी सर्वांनी एकमताने निवड समिती जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे सांगितले. तर उपमहापौर निवडीसाठी सुद्धा निवड समिती निर्णय जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांनी सांगितले.
आमदार सतेज पाटील यांच्यासोबत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी फोनद्वारे चर्चा करून निर्णय घेण्यात आला. यानंतर महापौर पदासाठी सचिन मारुती शेंडे, तर उपमहापौर पदासाठी जेष्ठ नगरसेवक दुर्वास कदम यांचे नाव जाहीर करण्यात आले.
विजय आपलाच; ऋतुराज पाटलांचा दावा
माजी ऋतुराज पाटील यांनी, कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण इतिहास घडवला आहे. सर्वात मोठा पक्ष आपण ठरलो आहोत. या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी एकट्याने वादळात दिवा लावण्याचे काम केले आहे. फक्त कोल्हापूर नाही तर संपूर्ण राज्याने हा इतिहास पाहिला आहे. सध्या महायुतीच्या नेते मंडळीत आणि नगरसेवक यांच्यामध्ये ताळमेळ नाही, आपण घट्ट राहिलो तर विजय आपलाच आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
…त्याचा फायदा आपल्याला नक्की होणार
शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी, चांगला कारभार करण्यासाठी विरोधी पक्ष सक्षम असावा लागतो. यात कमी पडायचं नाही म्हणून आपण लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. आमदार सतेज पाटील यांचा आदर्श समोर ठेवून ही निवडणूक आपण लढवायची आहे. महायुतीच्या नेतेमंडळी महापौर, उपमहापौर उमेदवारांची भांडणे सोडवण्यात व्यस्त आहेत. त्यांच्यात ताळमेळ नाही हे स्पष्ट दिसत आहे. त्याचा फायदा आपल्याला नक्की होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेदेखील वाचा : Kolhapur Mayoral Election: कोल्हापूर महापौर पदावर इच्छुकांची संख्या वाढली; नाराजी दूर करण्यासाठी करावी लागणार कसरत