
Maharashtra Politics, Sharad Pawar-Ajit Pawar NCP,
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवाार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरद पवार गट यांच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( NDA) मजबूत करण्यासाठी या दोन गटांना एकत्र आणण्याच्या बाजूने भारतीय जनता पक्ष (BJP) देखील सक्रीय भूमिका बजावत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आपला मंत्रिमंडळातील वाटा वाढवण्याचाही प्रस्ताव देत आहे.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, हे विलीनीकरण सोपे नाही. याचे कारण म्हणजे, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये ण पक्षांतर्गत पद आणि वर्चस्वावरून संघर्ष सुरू आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सुनेत्रा पवार, तसेच त्यांचे ज्येष्ठ पुत्र, राज्यसभा खासदार पार्थ पवार, यांचा या विलीनीकरणाला तीव्र विरोध आहे.
सुनेत्रा पवार यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याच्या मते, “शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पक्षावर पुन्हा नियंत्रण मिळवावे, असे आई-मुलाच्या जोडीला वाटत नाही.” दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते आणि बहुतांश आमदार या विलीनीकरणाच्या बाजूने आहेत.
विलीनीकरणाचा निर्णय घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बड्या नेत्यांमध्ये अनेक गुप्त बैठका सुरू आहेत. मंगळवारी रात्री, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी उपस्थित होते. त्यानंतर, गुरुवारी रात्री, राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. गुरुवारी संध्याकाळी, पार्थ पवार यांनी इतर नेत्यांशी झालेल्या चर्चेबद्दल विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, फडणवीस यांनी हे नाकारले आणि या विषयावर सुनेत्रा पवार यांच्याशी थेट बोलणार असल्याचे सांगितले.
जर दोन्ही गट विलीन झाल्यास सुनेत्रा पवार यांचा गटाकडून काही अटी-शर्ती लागू केल्या जाऊ शकतात, त्यात महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार याच कायम राहतील, अशी अट घातली जाऊ शकते.
सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. भाजप नेतृत्व आपले मतभेद बाजूला ठेवून दोन्ही पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. या अधिवेशनात महिला आरक्षण लागू करणे आणि लोकसभा जागांची पुनर्रचना करण्यासंबंधीचे घटनादुरुस्ती विधेयक मांडण्याचा सरकारचा मानस आहे. बहुमताअभावी हे विधेयक मागील अधिवेशनात रखडले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने दोन्ही गटांना एकत्र आणण्याची योजना आखली आहे. हे साध्य करण्यासाठी, प्रत्येक गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदाचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
पडद्यामागे सर्व घडामोडी सुरू असताना, दोन्ही पक्ष जाहीरपणे कोणत्याही विलीनीकरणाला नकार देत आहेत. सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य केलं होतं. “माझे बंधू अजित पवार जिवंत असताना विलीनीकरणाचा प्रस्ताव विचाराधीन होता. पण त्यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या बाजूने तीव्र विरोध झाला. आमच्यासाठी तो मुद्दा तिथेच संपला.” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. तसेच, जर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकात सर्व राज्यांसाठी समानतेने ५०% जागावाढीची तरतूद असेल, तर त्यांचा पक्ष त्याला पाठिंबा देण्याचा विचार करेल, असही त्यांनी नमुद केलं .
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे म्हणाले, “आजच्या घडीला कोणतीही चर्चा सुरू नाही. पण उद्या जेव्हा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर मतदान होईल, तेव्हा काय होईल हे आम्हाला माहीत नाही. राजकारण खूप वेगाने बदलते आणि क्षणात समीकरणे बदलू शकतात.”
२८ जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडू लागली. नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, अजित यांच्या निधनानंतर पार्थ पवार यांनी जुन्या आणि अनुभवी नेत्यांना बाजूला सारून आपल्या जवळच्या सहकाऱ्यांचा गट तयार करून पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. भाजपचे फडणवीस आणि शिवसेनेचे शिंदे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांसमोर सुनेत्रा आणि पार्थ ही जोडी पक्षाचे प्रभावीपणे नेतृत्व करू शकणार नाही, अशी आमदारांना शंका आहे.