Gopaldas Aggarwal BJP Gondia
गोंदिया : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी सर्व पक्षांची उमेदवार चाचपणी आणि जागांची जुळवाजुळवी सुरु आहे. दरम्यान, भाजपला गोंदियामध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार गोपालदास अगरवाल यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. कॉंग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याचा निर्णय जाहीर करताच गोपालदास अगरवाल भाजपवर आगपाखड केली आहे.
काय म्हणाले गोपालदास अगरवाल?
2019 च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी गोपालदास अगरवाल यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यावेऴी त्यांच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र एकाच टर्मनंतर माजी आमदार गोपालदास अगरवाल यांनी पुन्हा एकदा घरवापसीचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या काँग्रेस पक्षप्रवेश निश्चित झाल्यानंतर गोपालदास अगरवाल यांनी भाजपमधील अंतर्गत राजकारण आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. गोपालदास म्हणाले की, “पाच वर्षांपूर्वी मी मोठ्या अपेक्षेनं व या भागाच्या विकासाची हमी घेऊन भाजपात गेलो होतो. पण आमच्याकडच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच भाजपाचा पराभव करण्याचं काम केलं. तरीही मी गेल्या पाच वर्षांत इमानेइतबारे भाजपाचं पूर्ण निष्ठेनं काम केलं,” असे मत गोपालदास अगरवाल यांनी व्यक्त केले.
पुढे ते म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, लोकसभा निवडणुकांमध्येही मी गोंदियात न भूतो न भविष्यती असं मोठं मताधिक्य भारतीय जनता पक्षाला मिळवून देण्याचं काम केलं. पण तरीही गेल्या ५ वर्षांत भाजपामध्ये माझ्याप्रती विश्वास व सहकार्याची भावना मला खूप कमी दिसली. माझ्यासमोर उभे राहिलेल्या बंडखोर आमदारांना भाजपा सरकारची पूर्ण साथ मिळत आहे. त्यामुळे मला वाटतं की या भागात फक्त लूट चालू आहे. कोणताही चांगला उपक्रम इथे सुरू होऊ शकला नाही. आमच्याकडच्या सिंचन प्रकल्पांना चालना देण्याचं कोणतंही काम झालं नाही,” असा गंभीर आरोप गोपालदास अगरवाल यांनी भाजप पक्षावर केला आहे.
कॉंग्रेसच्या विजयावर विश्वास
पुढे गोपालदास अगरवाल यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास व्यक्त करताना सांगितले की, “माझी एकच मागणी आहे की काँग्रेसनं गोंदियातून लढायला हवं. मविआच्या सर्व घटक पक्षांनी गोंदियात विजय मिळावा यासाठी काँग्रेसला उमेदवारी दिली पाहिजे. मीही इच्छुक असणार आहे. पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य आहे. पाच वर्षांपूर्वी माझ्यामुळेच काँग्रेसला आमच्या विधानसभा क्षेत्रात, गोंदिया जिल्ह्यात फटका बसला होता. त्यामुळे मी परत काँग्रेसमध्ये येत असताना खर्गे, नाना पटोले यांच्याकडून खात्री घेतली आहे की गोंदियातून काँग्रेस निवडणूक लढणार. उमेदवार कुणीही असो. गोंदिया हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. यावेळी आम्ही मोठ्या मताधिक्याने काँग्रेससाठी विजय मिळवणार,” असा विश्वास देखील माजी आमदार गोपालदास अगरवाल यांनी व्यक्त केला आहे.