
Harshvardhan Sapkal
मुंबई, दि. ४ ऑगस्ट: गांधी भवनातील काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी कथितरित्या घुसून गोंधळ घातल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणामागे भारतीय जनता पक्ष आणि पोलिसांची फूस असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच अशा प्रकारच्या घटनांमुळे लोकशाही आणि राजकीय संस्कृतीला धक्का बसत असल्याचेही त्यांनी म्हटले.
यावेळी माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी काँग्रेसचे कार्यालय गांधी भवनमध्ये घुसून धुडगुस घातला. यामागे भारतीय जनता पक्ष व पोलिसांची फूस होती. एखाद्या पक्षाच्या कार्यालयात घुसून अशा पद्धतीने भ्याड हल्ला करण्याचा हा चुकीचा पायंडा पाडला जात आहे. आरे ला कारे म्हणता येते पण काँग्रेस पक्ष गांधींचा मार्ग सोडणार नाही. सांगून आले असते तर संविधान देऊन त्यांचे स्वागत केले असते.”
गांधी भवन मध्ये घुसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी हिंसा करण्याचा प्रयत्न केला, या भ्याड हल्ल्याचा निषेध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात आले होते पण त्याची भनक पोलिसांना लागली नाही यावर विश्वास बसत नाही, पोलिसांची भूमिका ही सदरक्षणाय, खलनिग्रहणाय नसून खलरक्षणाय अशी होती. काँग्रेस कार्यालय गांधी भवनला पोलीस सुरक्षा नव्हती, पोलिसांच्या नाकर्तेपणाचाही काँग्रेस पक्ष निषेध करतो.”
“आमच्यावर कितीही हल्ले केले तरी आम्ही विरोधी पक्षाची भूमिका सोडणार नाही, सभ्यता व संस्कृती सोडणार नाही. पण असेच सुरु राहिले तर कोणीही कोणाच्या घरात घुसेल. आम्हालाही त्यांना प्रतिक्रिया देता येते पण आम्ही आमचा मार्ग व संस्कृती सोडणार नाही. त्यांना काँग्रेस कार्यालयात हिंसाचार करायचा होता, ज्या व्यक्तीने हा धूडगुस घातला, त्याची अजित पवार यांनी पदावरून हकालपट्टी केली होती,” असे सपकाळ म्हणाले.
“काँग्रेस नेते व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना मौनी बाबा म्हटले होते तर इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया म्हटले होते पण त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने राष्ट्रनिर्मितीत मोठे योगदान दिलेले आहे, त्यांनी आपल्या कार्यातून उत्तर दिले. सुनेत्रा पवार यांनीही आपल्या कार्यातून उत्तर द्यावे. आता काहीजण काँग्रेस पक्षाला उपदेशाचे डोस पाजत आहेत, सभ्यता व संस्कृती शिकवत आहेत. काँग्रेसने सभ्यता व संस्कृती पाळूनच सुनेत्रा पवार यांच्याविरोधातील बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसचा उमेदवार मागे घेतला होता, त्यामुळे आम्हाला सभ्यता शिकवू नका,” असेही सपकाळ म्हणाले.
‘गुंगी गुडिया’ वादावर एकनाथ शिंदे संतापले; काँग्रेसने सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी