
Devendra Fadnavis
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी आणि मराठी भाषेच्या नात्यावर भाष्य केलं. हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख करत त्यांनी मातृभाषेचं महत्त्व अधोरेखित केलं. आपल्या पंतप्रधानांनी प्रत्येकाने आपल्या राज्याची मातृभाषा शिकली पाहिजे, असं म्हटलं आहे. कारण मातृभाषेतून मिळणारं ज्ञान आणि समज दुसऱ्या भाषेतून तितक्या सहजपणे मिळत नाही, असं फडणवीस म्हणाले.
मुन्शी प्रेमचंद यांच्या हिंदी साहित्याचा दाखला देत त्यांनी हिंदी भाषेच्या समृद्ध परंपरेचाही उल्लेख केला. मातृभाषेसोबत किमान आणखी एक भाषा शिकली पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
फडणवीसांच्या एका विधानाची मात्र चांगलीच चर्चा रंगली. ‘मराठी भाषा माझी आई आहे, तर हिंदी भाषा माझी मावशी आहे,’ असं ते म्हणाले. आईसोबत मावशीचाही सन्मान असतो, असं सांगत त्यांनी दोन्ही भाषांबद्दलचा आदर व्यक्त केला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कार्यक्रमात भाषण करताना अमित शाहांचं कौतुक केलं. जे अशक्य वाटत होतं, ते अमित शाह यांनी शक्य करून दाखवलं, असं म्हणत त्यांनी कलम 370 हटवण्याचा उल्लेख केला.
हिंदी आणि मराठी या केवळ देवनागरी लिपीतील भाषा नसून त्या अभिमानाचा विषय आहेत, असं शिंदे म्हणाले. संत नामदेवांच्या रचनांचा दाखला देत दोन्ही भाषांमधील जुना संबंधही त्यांनी अधोरेखित केला.
अमित शाह कालपासून मुंबई दौऱ्यावर असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दौऱ्याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे हिंदी दिवसाचा हा कार्यक्रम भाषेपुरता मर्यादित न राहता राजकीयदृष्ट्याही चर्चेचा विषय ठरला आहे.
Amit Shah UCC Statement : अमित शाहांचा मोठा दावा! लवकरच लागू करणार समान नागरी कायदा